बीड — स्व. काकूंची धर्मनिरपेक्ष शिकवणं मातीमोल करून स्वार्थाच्या राजकारणासाठी पक्ष बदललेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत यापूर्वीच जनतेने नाकारलं आहे. ज्यांचं बोट धरून भाजपात प्रवेश केला त्यांना देखील लोकसभेत बीडकरांनी घरची वाट दाखवली. योगेश भैया…! तुम्हीच सांगा निवडणुकी पुरतचं दारात जायचं अन् मत मागायचं एरवी घरात बसायचं मग बीडकरांनी तुम्हाला व तुमच्या उमेदवाराला का स्वीकारायचं ? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
स्वार्थाच राजकारण किती करायचं याला देखील मर्यादा असतात.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. योगेश क्षीरसागर सक्रिय झाले. उमेदवारी मिळावी यासाठी जंग जंग पछाडली. उमेदवारी मागण्यासाठी मोठ्या राजकीय कुटुंबात जन्म घेतला पैसा खर्च करण्याची धमक होती. एवढीच काय ते पात्रता होती. समाजकारण राजकारण याचा फारसा गंध त्यांना नव्हता.परिणामी ऐन निवडणुकीच्या मैदानात हाबुक ठोकून उतरले असले तरी जनतेने त्यांना घरीच बसवणं पसंत केलं. निवडणुका संपल्या नंतरच्या कालावधीत तरी समाजकारण करून जनतेशी नाळ जोडायला पाहिजे होती. शांततेच्या काळात युद्धाची तयारी करावी लागते म्हणतात. त्यावेळी योगेश क्षीरसागर काही महिने विजनवासात राहिल्यासारखे समाजापासून अलिप्त राहिले. कधीतरी एखादं पत्रक काढायचं शहरात होत असलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं. एवढाच फंडा त्यांनी सुरू केला होता. विशेष म्हणजे अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानीच्या काळात देखील ते फारसे जनतेत मिसळलेले दिसले नाहीत. बांधकाम विभागाचे अधिकारी घरी बोलवायचे. टेबल पुढे उभे करून स्वतः खुर्चीवर बसायचं व आपण कसे जनतेसाठी काम करत आहोत. आपल्याच आदेशाने कशा यंत्रणा हलतात मला जनतेची किती काळजी आहे. याचा भ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना उभे करून आदेश द्यायला योगेश क्षीरसागरांकडे कुठलंच संवैधानिक पद नव्हतं. मग त्यांनी त्यावेळी काढलेल्या बातम्यांच्या माध्यमातून दाखवलेला मुजोरपणा जनतेला आवडला नाही. या पलीकडे फारसं काम त्यांच्याकडून झालं नाही.
न.प.निवडणूकीच बिगुल वाजताच योगेश क्षीरसागर तंद्रीतून जागे झाले.35 वर्ष आपल्याच घरात सत्ता राहिली आहे आपण बीडचे राजकुमार आहोत अशा अविर्भावात निवडणुकीच्या तयारीला लागले. त्यांची ही स्वार्थी मानसिकता अजित पवारांना आवडलीच नाही. त्यांनी सरळ नाकारण्याची भूमिका घेतली. त्यानंतर
लगेच आपल्यावर खूप काही अन्याय झाला आहे.अस दाखवत सहानुभूती मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत भाजपची वाट धरली. भाजपच्या उत्साहाला इतकी उकळी फुटली की त्यात मग्रूरीचा उत मात चूलीला विझन पडण्याच्या स्थिती निर्माण झाली. हे सगळं पक्ष बदल करत असताना योगेश क्षीरसागर यांनी स्व. काकूंनी दिलेली धर्मनिरपेक्षतेची शिकवण एका क्षणात पायदळी तुडवली. यामध्ये क्षीरसागर कुटुंबीयांशी नाळ जोडला गेलेला प्रत्येक जाती-धर्माची लोक तुटली गेली. याचा विसर मात्र स्वार्थी राजकारणात योगेश क्षीरसागर यांना पडला.
स्व. काकूंच्या शिकवणीवर ठाम राहायचंच एवढं जरी ठरवलं असतं वेगळी आघाडी स्थापन केली असती तर कदाचित जनतेने डोक्यावर घेतला असतं. तीच बीडची जनता पुन्हा पायदळी तुडवायला मागे पुढे पाहणार नाही अस सध्याचं तरी चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. जनतेने विधानसभा निवडणुकीत का नाकारलं याच एकदा अवलोकन जरी केला असतं तरी त्याचा फायदा झाला असता. बरं ज्याचं बोट धरून भाजप प्रवेश केला त्यांच्या जीवावर नगरपालिकेची सत्ता आपल्याच हातात येणार याचा कैफ (धुंदी) डोक्यात चढला आहे.त्या नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीत बीड शहराच्या जनतेने सपशेल नाकारलं होतं. याचा विसर मात्र योगेश क्षीरसागर यांना पडलेला आहे. बीडच्या जनतेला वेड्यात काढण्याचा धंदा जनता हाणून पाडणार असं एकंदर निवडणुकीचं वातावरण असल्याचं राजकीय जाणकार सांगू लागल्या आहेत.

