बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपी पैकी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना एस पी च्या विशेष पथकाने पुण्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात पोलिसांना 25 दिवस उलटून गेल्यानंतर देखील अपयश येथे असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत होता. परिणामी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सापडत नसलेल्या आरोपींना फरार घोषित करून माहिती देण्याचे आवाहन जनतेला केले होते. दरम्यान राज्यभरातून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. या प्रकरणातील तीन आरोपी यापूर्वी पोलिसांनी पकडले होते तर वाल्मीक कराड याने सीआयडी समोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर मसाजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले असता आरोपींना दहा दिवसात जेरबंद करण्यात येईल असं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आश्वासन दिलं होतं. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्याजवळ ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी पैकी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.