
मुंबई — राज्यात फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने मोठा अलर्ट जारी केला आहे.मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव तसेच राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस कमाल तापमानात सरासरी २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. १ मार्च रोजी राज्यभर प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याचा अंदाज असून ढगाळ हवामान किंवा पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू शकतो आणि दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात उष्णतेसोबत दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. मुंबई शहरात कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान २३ ते २५ अंशांच्या दरम्यान राहू शकते. सकाळी तसेच संध्याकाळीही उष्णतेची जाणीव कायम राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. पुण्यात दिवसा तापमान झपाट्याने वाढताना दिसेल, तर रात्री तुलनेने थोडा गारवा जाणवू शकतो. मात्र दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. वाढते तापमान आणि कोरडे हवामान यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातही तापमानात अधिक वाढ होण्याचा अंदाज आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



