मुंबई — महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटक झालेल्या अशोक खरात याच्या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी सुरू असून दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणात केवळ गुन्हेगारीच नव्हे तर राजकीय संबंधांचाही मुद्दा पुढे येऊ लागला आहे. खरातसोबत अनेक नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर आधीच खळबळ उडाली होती. आता कॉल रेकॉर्डवरून आणखी वाद वाढला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठे आरोप करत काही कॉल डिटेल्स सार्वजनिक केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रुपाली चाकणकर यांचे तब्बल १७७ कॉल्स खरातला झाले असून त्यांच्या बहिणीचे २३६ कॉल्स असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल्स झाल्याचे सांगण्यात आले असून त्यामध्ये १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल्स असल्याचा आरोप आहे. या संभाषणातील सर्वाधिक वेळ २१ मिनिटांचा असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
याचबरोबर चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी ८ कॉल्स, तर आशिष शेलार यांचा एक कॉल असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे यावर प्रतिक्रिया देत ही माहिती जनतेसमोर यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनीही कॉल रेकॉर्ड संदर्भात स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली आहे.
या सर्व आरोपांमुळे अशोक खरात कॉल रेकॉर्ड वाद अधिकच गडद झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता SIT तपासातून नेमकी सत्यता काय समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

