नवी दिल्ली — भारतावर नवं संकट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. याला शक्ती असे नाव देण्यात आले आहे.
ते दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ते 28 मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो.
24 ते 26 मे दरम्यान किनाऱ्याला धडकणार
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ 23 मे ते 28 मे दरम्यान धोकादायक रूप धारण करू शकते. यामुळे पूर्वेकडील राज्यांच्या किनारी भागात आणि बांगलादेशातील खुलनामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत हवामान विभागाने आधीच लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ 24 ते 26 मे दरम्यान किनाऱ्यावर आदळू शकते, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या राज्यांना सर्वाधिक धोका
शक्ती चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा, बंगाल आणि बांगलादेशातील किनारी भागावर होऊ शकतो. हे चक्रीवादळ बंगालच्या किनारी भागातून बांगलादेशातील खुलना येथे पोहोचू शकते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्यात तीन कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, त्यापैकी एक चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारने स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे
किनारी भागांना सर्वाधिक धोका
शक्ती चक्रीवादळ 24 ते 26 मे दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात तसेच बांगलादेशातील खुलना आणि चितगाव प्रदेशात ते धडकण्याची शक्यता आहे. आयएमडीने या भागांसाठी येलो इशारा जारी केला आहे आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे क्षेत्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात ढगदाळ वातावरणाची शक्यता आहे.
समुद्रात न जाण्याचे आवाहन
हवामान विभागाने किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात न जाण्याच व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

