अंबाजोगाई — शहरातील मोरेवाडी परिसरातील माऊली नगर येथे राहणाऱ्या नवनाथ कदम यांच्या घरासमोर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पंडित चव्हाण याचा कदम यांच्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता. मागील काही दिवसांपासून तो सतत धमक्या देत होता. याबाबत कदम कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.आज सकाळी चव्हाण कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत त्यांच्या सिद्धेश्वर या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी सिद्धेश्वर याला लागली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोळी झाडण्यासाठी चव्हाण याने गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे.घटनेनंतर तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तपास करत आहेत. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी चार तासात आरोपीला जेरबंद केले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.