बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेते राजीनामा मागत आहेत. ही मागणी जोर धरत असतानाच धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नाहीत. दोष नसताना ते मीडिया ट्रायल ला बळी पडत आहेत. त्यामुळे “भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे”अस महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबरोबर काय चर्चा झाली?या विषयाची माहिती डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. तसेच त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट करत भगवानगड मंत्री धनंजय मुंडे च्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं.
डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या सांप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असे स्पष्ट मत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत. तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरु आहे”, असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
मला माध्यमांना असं विचारावसं वाटतं की ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. मात्र, त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. आज ज्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे ते नेते खंडणीवर जगणारे नाहीत. गेले जवळपास 53 दिवस झाले आहेत मीडिया ट्रायल चालवले जात आहेत. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही. मात्र, त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांची पार्श्वभूमी तशी नाही”, अशी भूमिका नामदेव महाराज शास्त्री यांनी घेतली आहे. त्यामुळे बीडमधील राजकीय परिस्थिती धनंजय मुंडे यांच्याविरोधात असले तरी देखील भगवानबाबा गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे.