बीड — बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या वतीने पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केले. प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन काही काळाने स्थगित करण्यात आले.
आज दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत” हिरवा झेंडा” दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. मात्र, बीड रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी, यासाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले. रेल्वे स्थानकाला लोकनेत्यांचे नाव दिल्यास सामाजिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोक नेत्यांच्या नावाविषयी मतभेद आहेत परंतु महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला अद्याप कोणीही विरोध केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जिल्हा वासियांची पसंती असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी सांगितले.
१७ सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनावेळी पाली गावचे तलाठी अनिल गायकवाड, मंडळ अधिकारी शीतल चाटे, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पो. कॉ. दुबाले, बाबर, जायभाय, तसेच आम आदमी पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे, बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक, रासप बीड तालुकाध्यक्ष बाबासाहेब सापणकर, रामहरी चाळक अंजनवतीकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांची उपस्थिती होती.
प्रशासनाने या मागणीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन काही वेळाने स्थगित करण्यात आले. मात्र, जर मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

