बीड — मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने बीड शहरात प्रथमच रेल्वे धावणार आहे. त्यामुळे17 सप्टेंबर 2025, हा दिवस बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. चाळीस वर्षांपूर्वी बीडकरांनी पाहिलेलं रेल्वेचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ हा 261 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग तयार व्हावा यासाठी बीड वासियांना मोठा व दीर्घकाळ लढा द्यावा लागला. या रेल्वे मार्गाचा स्वप्न तब्बल दोन पिढ्यांनी पाहिलं. अहिल्यानगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मराठवाड्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या मार्गावर एकूण 19 स्थानके असतील, ज्यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागांचा थेट संपर्क देशाच्या इतर भागांशी होईल. या प्रकल्पासाठी सुमारे 4100 कोटी रुपये खर्च झाले असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त भागीदारीतून हे काम पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निम्मा निधी पुरवला असून, नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे.
अहिल्यानगर ते बीडदरम्यान १६ स्थानके आहेत. नगरहून सुटलेली गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर (भांड्याचे), रायमोह, एगनवाडी, जाटनांदूर, राजुरीमार्गे बीड येथे पोचेल.अहिल्यानगरहून सकाळी ६:५५ ला रेल्वे सुटेल व दुपारी १२:३० ला बीडला पोचेल. परतीच्या प्रवासात बीडहून ती दुपारी एकला सुटेल आणि सायंकाळी साडेसहाला अहिल्यानगरला पोचेल. आठवड्यात सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी विश्रांती असेल.
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्ग म्हणजे बीड, अहिल्यानगर आणि परळी वैजनाथ भागातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी विकासाला नवी गती देणारा प्रकल्प आहे. या मार्गामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा प्रकल्प गतीमान करण्याचा माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.बीड जिल्ह्याचा चेहरा बदलणाऱ्या या प्रकल्पामुळे बीडकरांच्या आयुष्यात नवा विकासप्रवास सुरू होईल” असा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे

