बीड — परप्रांतीय शहरात येतो, पोलिसांच्या नाकावर टिच्चून गंडवण्याचा गोरख धंदा वाजत गाजत चालू करतो. पोलिसांकडे तक्रारी येतात तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शेवटी कोट्यावधी रुपयांचा चुना लावून तो फरार होतो. ही फिल्मी कहानी नाहीतर सत्य हकीकत आहे. या सर्व प्रकारावर पांघरून घालणारे बल्लाळच गुंतवणूकदारांचे भल्लाळ देव बनले आहेत.
पतसंस्थांनी करोडो रुपयाला गंडा घातल्यानंतर अरेबियन ज्वेलर्स च्या नावाखाली जनतेला लुटण्याचा गोरख धंदा सुरू केला गेला. धमाका ऑफर च्या नावाखाली फ्लॅट, चार चाकी गाडी, बुलेट सारख्या गाड्यांच आमीष लोकांना दाखवलं जात होतं. सारासार विचार बुद्धीचा वापर करणारा प्रत्येक जण ही फसवणूक असल्याचं सांगत होता. पण बीड शहर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. साडेचार हजार रुपये नोंदणी फीस घेऊन अडीच हजाराहून अधिक सभासद या योजनेमध्ये सहभागी करून घेतले. दर महिन्यासाठी लकी ड्रॉ च्या नावाखाली पैसे जमा केले जायचे. दोन-तीन कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठांच्या हस्ते बक्षीसांच वितरण केलं. दरम्यान याच वेळी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाप्रमुख तथा ठेवीदार संघर्ष कृती समितीचे प्रा. सचिन उबाळे यांनी पोलिसांनी जनतेला गंडवणाऱ्या या महाभागाला आळा घालावा अशी मागणी निवेदन देऊन केली. नेहमीच्या सवयीने बल्लाळांची “लाळ“इथे देखील टपकली. त्यांनी कारवाई केलीच नाही. इतकच नाही तर शॉप ॲक्टच लायसन घेऊन हा गोरख धंदा उभा केला होता याची शहानिशा करण्याची देखील तसदी घेतली नाही. गोरगरिबांना लुटतोय लुटू द्या; या प्रकारात बल्लाळ यांनी स्वतःचा फायदा बघितला त्यात गोरगरीब मात्र बुके कंगाल झाला. “माया” आणि “काया” यासाठी वाटेल ते ऽऽ! असं म्हणणाऱ्या माणसाकडून जनतेचे भलं होईल, गुन्हेगारीला आळा बसेल अशी अपेक्षा तरी कशी धरणार ?
बरं ही जनतेची लूटमार सुरू असताना काही संपादक म्हणवून घेत विश्वाचे नायक असल्याचे सिद्ध करणाऱ्यांनी अरेबियन ज्वेलर्स विरोधात तक्रार करणाऱ्या प्रा. सचिन उबाळे यांच्यावरच चिखल फेक करत. बिल बिल करून सोडलं होतं. त्यावेळी बल्लाळ देवाची बाजू देखील घेण्यात आली होती. हे वास्तव नाकारून कसं चालेल? मीडिया मॅनेजमेंट करण्यात देखील अनेकांचा सहभाग होता. खूप मोठ् रॅकेट बंगाली बाबू ने सक्रिय केलं होतं. अनेकांनी अरेबियन ज्वेलर्स च्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे वृत्त देखील दिले होते. त्यामध्ये “सह्याद्री माझा” ने देखील पोलिसांच्या निदर्शनास येण्यासाठी पोलिसांवर टीका केली होती. मात्र त्याकडे देखील बल्लाळानी सवयीप्रमाणे दुर्लक्ष केलं.
बरं विशेष बाब म्हणजे एका ज्वेलर्स मालकाला अरेबियन ज्वेलर्स चा मेहबूब रहमान या बंगाली बाबुने धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वठला नाही म्हणून या ज्वेलर्स मालकाने फसवणूक झाल्याची तक्रार दोन अडीच महिन्यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. यावर देखील बल्लाळ देवाने कुठलीच कारवाई केली नाही. जिल्ह्यात आयजी येणार म्हटल्यानंतर दुकानावर जाऊन चौकशी करावी याची उपरती झाली.बल्लाळानी दोन महिने फसवणूक करणाऱ्या बंगाली बाबुला पळून जाण्यासाठी वेळ दिला. तो पळून जाण्यात यशस्वी झाला. बीडच्या जनतेला गंडा घालून पळालेला हा बंगाली बाबू खरंच स्वतःच्या संसाराला हा पैसा वापरणार आहे का? की त्या पैशाचा वापर इतर समाजविघातक कृत्यासाठी वापरणार? हे येणारा काळच ठरवणार आहे. काहीही असो बंगाली बाबुला पळून जाण्यास पुरेसा वेळ बल्लाळांनी दिल्यामुळे बीडच्या गोरगरिबांच्या लेखी ते भल्लाळ देव बनले आहेत.

