बीड — बदली प्रक्रियेत पोलीस दलाने आदर्श निर्माण केलेला असतानाच महसूल मध्ये मात्र अधिकार पदाचा “स्वामी“आपणच असं म्हणत घोडेबाजार भरवण्यासाठी खेळी खेळण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे. या घोडेबाजारातून लाखोंचा “महसूल” जमवत नियमांना घोडे लावण्याचे काम सुरू आहे. एकाच तालुक्यात अनेक वर्ष कुंडली मारून बसलेल्यांना अभय दान द्यायचं तर जे भरवलेल्या बाजारात उभे नाहीत त्यांचा खेळ खंडोबा करायचा असा हा सगळा डाव आहे. जिल्हाधिकारी हा डाव उधळून लावणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सध्या बदली प्रक्रियेचे वारे जोराने वाहत आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी जिल्ह्याच्या नेहमीच्या परंपरेला फाटा देत आदर्श पद्धतीने बदली प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेचं कौतुकही मोठ्या प्रमाणावर झालं. आता हाच आदर्श “महसूल प्रशासनातील बदली प्रक्रियेत नवीन आलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही स्थापन करावा अशी मागणी होऊ लागली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या व सहा वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची वेगवेगळी यादी प्रसिद्ध करण्यात येते. ती प्रसिद्ध करून कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागवण्याचं काम केलं जातं. याच पद्धतीने सहा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मात्र तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी जाहीर न करताच बदली प्रक्रियेचा आपणच “स्वामी” आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून नियमांना फाटा देत ” शिव“(हद्द) सहज पार करू शकतो असा “कुमार“(बालक) शेंबडा चाळा सुरू केला आहे. महसूल मधल्या उच्चपदस्थ “स्वामी“समजणाऱ्या अधिकाऱ्याने आपला तट्टू या कामी जुंपला आहे. वैयक्तिक पातळीवर हा तट्टू कर्मचाऱ्यांना फोन करून विनंती अर्ज द्या, विकल्प सांगा असं म्हणत भंडावून सोडत आहे.यादी प्रसिद्ध न करताच कर्मचाऱ्यांनी खाजगीत संपर्क साधावा अशी ही खेळी खेळली जात आहे. यातून लाखो रुपयांचा घोडेबाजार भरवला जाणार आहे. तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध न केल्यामुळे कुठे रिक्त जागा आहे हे समजणं अवघड होऊन बसला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने बदली पात्र ठरविण्यात येत आहे. तालुक्यामध्ये अनेक वर्ष कुंडली मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांना तालुक्याबाहेर पाठवा अशी तक्रार वजा आर्जव तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याने करून देखील “त्या” कर्मचाऱ्यांना बदल्यांपासून संरक्षण देण्याचा खेळ मांडला जात आहे. त्यासाठी तांत्रिक बाबीचा आधार घेत बदली प्रक्रियेतून कुंडली मारून बसलेल्या कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेतून दूर ठेवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. विकृत मनोवृत्तीतून “कुमारा“चा (बालक) नियमांचा “शिव” (हद्द) ओलांडण्याचा प्रयत्न करून शेंबडा खेळ खेळणाऱ्या घोडेबाजाराच्या या “स्वामी” ला विवेकाची वेसन घालून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महसूल प्रशासनात नवा आदर्श निर्माण करावा अशी मागणी होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी पारदर्शक पणाने कोणावरही अन्याय न होता वशिलेबाजीला फाटा नक्कीच देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

