Sunday, February 1, 2026

नवनीत कावतांच्या “नशा मुक्त” अभियानाला गोसावींच्या “नशा युक्त” अभियानाचे चोख उत्तर

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या नशा मुक्त अभियानासाठी बीडकर एक दिवस धावले. यासाठी प्रशासनाने तिजोरीतून पैसा खर्च केला पण एपीआय चंद्रकांत गोसावी राबवत असलेल्या नशा युक्त अभियानात तरुणाई दररोज झिंगताना दिसून येत आहे. गांजा असो की दारू यातून मिळणाऱ्या महसुलातून राज्यासह स्वतःची तिजोरी भरत अर्थचक्राला गती दिली जाऊ लागली आहे.
जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने 17 ऑगस्ट रोजी पोलीस दलातर्फे नशा मुक्त अभियान राबवण्यात आले. त्याकरता बीड करांना धावायला लावले. पोलीस अधीक्षक नवनीत कांवतांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळाला. त्यासाठी शासकीय तिजोरी तून खर्च करण्यात आला. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत नशा युक्त अभियानाची केली गेलेली सुरुवात तरुणाईला दररोज झिंगायला लावत आहे. नवनीत कावत यांचा नशा मुक्त अभियानाचा फीवर एक दिवस राहिला. मात्र गोसावींच्या अभियानाचा फीवर कायम राहिला आहे. गांजा असो की दारू खेड्यापाड्यात देखील मिळू लागली आहे. प्रत्येक धाब्यावर अवैध दारूचा महापूर आल्याचं चित्र अनुभवायला येत आहे. सहज गांज्यासारखे अमली पदार्थ उपलब्ध होत असल्याने तरुण पिढीवर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. एपीआय चंद्रकांत गोसावी यांनी राबविलेल्या नशा युक्त अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यातूनच बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेला गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून केलेल्या कारवाईत मांजरसुंबा अंबाजोगाई महामार्गावर चार किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने सूचना दिल्यावरून नेकनूर पोलिसांच्या समन्वयाने ही कारवाई केली गेली. चौसाळा असो की नेकनूर ही मोठी शहर गांजाला बाजारपेठ मिळवून देऊ लागली आहेत.या बाजारपेठेतूनच ग्रामीण भागात हा माल पोहोच केला जातो. तीच स्थिती दारूची देखील आहे.गाव खेड्यात उघडलेल्या धाब्यांमधून सर्रास बनावट दारूसह देशी विदेशी ब्रँड उपलब्ध होत आहेत. हे धाबे गर्दीने अक्षरशः फुलून जाऊ लागले आहेत. अशीच स्थिती राष्ट्रीय महामार्ग असो की राज्य महामार्ग येथेही सहज उपलब्ध होते आहे. हातभट्टीसह, केमिकल युक्त ताडी देखील मोठ्या प्रमाणात चौसाळ्या मध्ये उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत गोसावी यांनी राबविलेल्या नशा युक्त अभियानामुळे राज्याच्या अर्थचक्राला गती तर मिळालीच आहे पण धाब्यावाल्यांसह तस्करी करणाऱ्यांना देखील रोजगाराचं साधन उपलब्ध झाला आहे. त्यातून गोविंद राख सारखे बदली झालेले पोलीस कर्मचारी हाताशी धरून मोठी कमाई देखील केली जाऊ लागली आहे. किरकोळ वादविवाद नशेच्या माध्यमातून झाले तर ते पोलिसांच्या मध्यस्थीने सोडविले जातात. त्यातून मिळणारी बिदागी मोठ्या प्रमाणावर आहे. बेवड्यांच्या गोंधळामुळे रस्त्यावर फिरणं जिथे पुरुषांना शक्य नाही तेथे महिलांनी फिरण्याचा विषयच येत नाही त्यामुळे महिला अत्याचारांच्या घटनांना देखील आळा बसला आहे. राहिला प्रश्न कौटुंबिक वादविवादाचा तोही तिजोरीत भर घालणाराच आहे. एकंदरच राज्यासह स्वतःच्या तिजोरीत भर घालणाऱ्या अर्थचक्राला गोसावींनी नशा युक्त अभियानाने बळकटी दिल्यामुळे नवनीत कांवत यांच्या नशा मुक्त अभियानाला वरचढ अभियान गोसावींच ठरू लागलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles