Monday, February 2, 2026

“तर आपण भीकेला लागू”; वाल्मीक कराडचा ‘तो’ फोन कॉल उघड

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपास पूर्ण करून मकोका न्यायालयात चौदाशे हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

यामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली आणि हत्येचा कट कोणी रचला, याबाबतची सविस्तर माहिती या आरोपपत्रातून समोर आली आहे.

वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, त्याचा या हत्येशी काहीही संबंध नाही. परंतु, हा दावा खोटा असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. वाल्मिकचा संतोष देशमुख यांच्या हत्येत थेट सहभाग होता आणि त्यानेच सुदर्शन घुलेला फोन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले याने वाल्मिक कराडला फोन केला होता. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले, ‘कोणीही उठतोय आणि आपल्या आड येतोय. असंच सुरू राहिलं तर आपण भीकेला लागू.’

‘असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता मागचं पुढचं काही बघू नका. जो कुणी आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा…. विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल,’ अशा सूचना वाल्मिकने सुदर्शन घुलेला दिल्या.
आवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीने मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथे पवनचक्कीच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात कंपनीची सुमारे 300 ते 350 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. 8 ऑक्टोबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या काळात वाल्मिक कराड , विष्णू चाटे , सुदर्शन घुले , प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कट रचून आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा आणि जो कोणी या मागणीला विरोध करेल, त्याची हत्या करून परिसरात दहशत पसरवण्याचा कट रचला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles