परळी — दुसऱ्याच्या जमिनीवर तिसऱ्यानेच पीक विमा काढून फसवणुकीचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पांगरीतील एका शेतकऱ्याने तक्रार दिली असून परळीतील दोन मल्टी सर्व्हिसेस चालक आणि २ शेतकरी अशा चौघांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगरी शिवारातील गट नं ३९ मध्ये शेतकरी अंगद गणपतराव मुंडे यांनी जमीन आहे. त्यांनी २०२२, २०२३ मध्ये सोयाबीन पिकाचा सात एकर तीन गुंठे जमिनीचा पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरला होता. त्यानंतर काही दिवसांनी पांगरी येथे पीक विमा कंपनीचे अधिकारी आले. अंगद मुंडे यांना भेटून पीक विमा दोनदा का भरला, अशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी पीक विमान दोनदा भरला नसल्याचे स्पष्ट केले. अंगद मुंडे यांनी चौकशी केली असता गट क्रमांक ३९ मधून मधुकर भगवानराव भारती (रा. लिंबुटा) यांनी देखील पीक विमा भरल्याचे पुढे आले. त्यानंतर अंगद मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडून विम्याबाबत माहिती घेतली असता भलताच प्रकार पुढे आला. पांगरीतील रवींद्र दामोदर मुंडे यांनी त्यांच्या जलालपूर येथील आसावरी मल्टी सर्व्हिसेस येथून जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान पीकविमा भरला होता. त्यामुळे अंगद मुंडे यांचा विमा रद्द करण्यात आला. त्यामुळे त्यांना पीक विम्याचा ९२ हजारांचा चेक मिळालाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंगद यांनी परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. ईन पांगरीत पीक विम्याच्या फसवणुकीचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. यामध्ये गावातील शेतकरी अशोक किसनराव मुंडे यांच्या गट क्रमांक ७६ या शेतात धनराज उत्तम चौधर यांनी केदारेश्वर मल्टी सर्व्हिसेसमध्ये कौसाबाई लक्ष्मण राठोड, रा. पांगरी तांडा यांचा पीक विमा भरला. त्यामुळे अशोक मुंडे यांचाही पीक विमा रद्द झाला. असे बोगस प्रकार गावात अनेक शेतकऱ्या बाबतीत घडले असून काहींना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे. परळी पोलिसांत दाखल गुन्ह्यानुसार, मधुकर भगवानराव भारती, रवींद्र दामोदर मुंडे (दोघेही रा. लिंबुटा), धनराज उत्तम चौधर (रा. लोकरवाडी), कौसाबाई लक्ष्मण राठोड (रा. पांगरी तांडा) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.