गेवराई — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार विजय राजे पंडीत आणि
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी समोरासमोर येऊन एकमेका विरूद्ध घोषणाबाजी केल्याने, गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी चौकात तणाव निर्माण झाला. हा सगळा गोंधळ सोमवार ता. 25 रोजी साडेचार वाजता अचानक घडल्याने पोलीसांची दमछाक झाली. दरम्यान, दोन्ही गटाला पोलीसांनी बाजुला केल्याने अनर्थ टळला गेला.

दोन दिवसांपापूर्वी प्रा. हाके यांनी आमदार पंडीत यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर, दोन्ही गटात सोशल नेटवर्किंग साईटवर शाब्दिक हल्ले करण्यात आले होते. रविवार ता.24 रोजी शास्त्री चौकात आ. पंडीत समर्थकांनी हाके यांचा पुतळा जाळून निषेध केला. सोमवारी काळे नावाच्या युवा नेत्याला गेवराई पोलीसांनी ताब्यात घेतल्याने पून्हा वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
गेवराई पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून, गजानन काळे यांना सोडण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळाने स्वतः प्रा. हाके यांचा ताफा गेवराई च्या दिशेने आल्याने, दोन्ही गट समोरासमोर आले. एकमेकांवर धाऊन जाण्याचा प्रयत्न झाला. एकमेका विरूद्ध घोषणाबाजी झाल्याने, तणाव निर्माण झाला. अज्ञातांनी हाके यांच्या गाडीच्या दिशेने दगडफेक केल्याने, तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाशराव सोळंके यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद रविवारी गेवराई शहरात उमटले. संतप्त झालेल्या मराठा आणि ओबीसी समाजातील युवकांनी प्रा.हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी दंडुकाने मारहाण केली. पुतळा पायाखाली तुडवून जाळला. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले होते. तसेच आमदार समर्थकांनी हाके यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान सोमवारी लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला. त्याच ठिकाणी दुग्धाभिषेक करून चहा पिणार असल्याचे चॅलेंज दिले होते. यावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गटातील समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मण हाके या ठिकाणी येताच विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करून, चप्पल फेकल्या. दरम्यान परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तसेच गेवराई पोलिसांच्या लक्ष्मण हाके यांच्या गाडीला घेराव घालत शहराबाहेर काढले, यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. गेवराई शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीसांनी प्रकरण व्यवस्थित हाताळल्याने तणाव आटोक्यात आला आहे.

