परळी — तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची कौटुंबिक वादातून डोक्यात कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री जळगव्हाण ता.परळी येथे घडली. अतिशय निघृणपणे खून करून डोके पुर्णतः ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव भीमराव
शिवाजी राठोड असून, आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे, जो घटना स्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान मयत भिमराव राठोड हे आरोपी अनिल चव्हाणचे मेव्हणा असून कौटूंबिक वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल बाबासाहेब चव्हाण वय 30 वर्ष, रा.रामनगर तांडा आणि पप्पु उर्फ भीमराव शिवाजी राठोड वय 26 वर्ष, रा.रामनगर तांडा, ता. परळी यांच्यात घरगुती वाद सुरू होता.हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता आणि यावरून अनिल चव्हाणने भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांड्यात बोलावले. या भेटीत दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला. बाचाबाची झाली आणि नंतर हाणामारीत रूपांतर झालं. या हाणामारी दरम्यान अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेकदा वार केले. यात भीमराव गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे सपोनि. गोरखनाथ दहिफळे, सोनवणे, देशमुख, तौर, मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाणच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
या हत्येच्या घटनेमुळे रत्ननगर तांडा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि शेजारी घाबरलेले आहेत. पोलिसांनी येथील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी अधिक सुरक्षाबळ तैनात केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सखोल तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब आणि मोबाइल लोकेशन यांचा आधार घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने हाताळत अनिल चव्हाणला लवकर पकडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

