सव्वा महिन्यापूर्वी गायब झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागेना
नेकनूर — एकीकडे कायदा व्यवस्थेची घडी बसवल्याचा ढोल एस पी कडून वाजवला जात असताना दुसरीकडे मात्र गोसावींनी पोलिसांचा “नेक” नूर कसा बदलला आहे याची प्रकरण बाहेर येऊ लागली आहेत.गेल्या सव्वा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध मात्र नेकनूर पोलिसांना लागत नसल्याने नेमका शोधच लागत नाही,की पोलिसांना शोधच लावायचा नाही.असा प्रश्न मुलीचे आई-वडील व नातेवाईकांमधून विचारला जात आहे.
जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची घडी बसवली आहे. किती आरोपींना तडीपार केलं, किती आरोपीवर मकोका लावण्यात आला. याची आकडेवारी मांडत स्तूतीचा ढोल पोलीस अधीक्षकांकडून वाजवण्यात आला.पण त्यात तथ्य असलं तरी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवण किती अवघड आहे याच्या एक एक सुरस कहाण्या नेकनूर पोलीस ठाण्याच्या बाबतीत बाहेर येऊ लागल्या आहेत. अवैध धंद्यांना गोसावींच मिळालेले संरक्षण, गावोगाव दारू विक्रीला गोसावींनी दिलेली संमती, त्यातून बरबादी च्या वाटेवर असलेली तरुणाई, अवैध वसुली,चोऱ्या,दरोडे, किरकोळ गुन्हे हे एक वेळेला मान्य पण पोटची लेक गेल्या सव्वा महिन्यापासून गायब असताना तपासाच्या नावाखाली त्या आई-वडिलांना मूर्खात काढत तपासात चाल ढकल करून गोसावींनी पैशापुढे माणुसकी महत्त्वाची नसल्याचं सप्रमाण सिद्ध केलं. सव्वा महिन्यापासून धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलगी गायब झाली. आई-वडिलांनी नातेवाईकांकडे इतरत्र शोध घेतला. पण ती सापडली नाही. हातबल झालेल्या आई-वडिलांनी नेकनूर पोलिसात धाव घेतली. रीतसर तक्रार दाखल केली.मुलगी कोणी पळवली असेल याबद्दल संशयित लोकांची नावं देखील नेकनूर पोलिसांना दिली.यानंतर आम्ही तपास करत आहोत. लवकरच मुलीचा शोध घेऊ असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते याबद्दल मुलीचे नातेवाईक दररोज पोलीस स्टेशनला येऊन न्यायासाठी रडगाणं गात होते. मुलीचा शोध लावा आमची मुलगी आम्हाला मिळवून द्या असं म्हणून टाहो फोडत होती. पण मिळणारी वर कमाईच्या खणखनाटापुढे चंद्रकांत गोसावी ला त्या आई-वडिलांच्या जीवाची होणारी तगमग त्यातून निघणारा हुंकार ऐकू गेलाच नाही. येणाऱ्या प्रत्येक दिवशी नेकनूर पोलिसांकडून एकच उत्तर ऐकावयास मिळत होते ते म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला काहीतरी सुगावा लागेल त्याचबरोबर मोबाईलचे सी.डी.आर. काढत आहोत, आणखी त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आम्ही चौकशी करत आहोत असे उत्तर गेल्या सव्वा महिन्यापासून ऐकावयास मिळत आहेत परंतु मुलीचा शोध लागत नसल्याने मुलीच्या आईने काही दिवस अन्न पाणी ही वर्ज्य केले होते परंतु तिची खालावत चाललेली तब्येत पाहून नातेवाईकांनी तिला अन्नपाणी घेण्यासाठी आग्रह केला.परंतु तरीही मुलीचा शोध लागत नसल्याने व त्या मुलीच्या आईची तब्येत खालावत असल्याने एक दिवस मुलीच्या आई-वडिलांसह इतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. पुन्हा तेच आश्वासन देऊन वेळप्रसंगी दाप दडप करून आई-वडील व नातेवाईकांना परत पाठवण्यात आले.त्या मुलीचा शोध का लागत नाही? मुलीच्या आई-वडिलांनी ज्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला आहे त्या लोकांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडून का चौकशी केली जात नाही? मग मुलीचा शोधच लागत नाही, की नेकनूर पोलिसांनाच शोध लावायचा नाही याबाबत मात्र मुलीचे आई-वडील व नातेवाईकांमधून नेकनूर पोलिसांच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
एस पी साहेब तुमचा प्रामाणिक कारभार आहे यात शंका घेण्याचं कोणतं कारण नाही. पण चंद्रकांत गोसावीं तुम्ही एवढा लाडावून ठेवण्याचं कारण काय? माध्यमांनी बातम्या छापूनही गोसावी वर कारवाई आजपर्यंत का झाली नाही? जनतेला न्याय मिळाला काय नाही मिळाला काय याच्याशी तुम्हाला देणं घेणं नव्हतं काय? ही जबाबदारी तुमची नाही काय? गायब झालेल्या मुलीच्या आई-वडिलांना न्याय मिळणार कसा? नेकनूर पोलीस ठाणं म्हणजे गुन्हेगारांचं अभय केंद्र नाही किमान एवढ्या तरी कान पिचक्या का दिल्या नाहीत? एकीकडे नेकनूर पोलीस ठाण्यात गोसावींनी इतकी बेबंदशाही माजवलेली असताना मग कायद्याची घडी बसवल्याचे ढोल का वाजवण्यात आले? अन् गोसावी ला मोकळ कुरण का सोडण्यात आले?यासारखे अनेक प्रश्न
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील जनतेकडून विचारले जात आहेत.

