बीड — कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाची भाववाढ करावी या मागणीसाठी शेतकरी पुत्र आज बीडच्या रस्त्यावर उतरलेले दिसले. शेतकरी हक्क मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले
बीडच्या रस्त्यावर शेतमालाला बाजार भाव मिळावा यासाठी शेतकरी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
कापसाला 12 हजार, सोयाबीन 7 हजार, तूर 12 हजार प्रतिक्विंटल भाव द्यावा, कापूस 8 हजार 100 तर सोयाबीन 5 हजार 328 रुपये पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, सी.सी. आय कडून होणारी अडवणूक थांबवुन खरेदी सुरळीत करण्यात यावी, विदेशातुन होणारी कापूस व सोयाबीन पिकांची आयात बंद करावी या सारख्या अनेक मागण्यासाठी शेतकरी पुत्रांनी आज गुरुवारी सकाळी शेतकरी हक्क मोर्चा काढला.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मागील जवळपास महिनाभरापासून तयारी सुरू होती. सोशल मीडिया तसेच गावागावात बैठका घेऊन शेतकरी पुत्रांची जनजागृती सुरू होती. याचा मोठा फायदा मिळाला असून शेतकरी पुत्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

