एस पी साहेब..!नेम प्लेट बदलली पोलीस दलाचा चेहरा बदलता आला नाही;चक्क 10 मर्डर ,दोन महिन्यात ? भाग – 1

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस दलाला नवनीत कांवत यांच्या रूपाने नवा चेहरा मिळाला. कायदा सुव्यवस्था ताळ्यावर येईल असा विश्वासही वाटला होता. नव्याचे नऊ दिवस सरले अन् पुन्हा कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघू लागले. पोलीस कर्मचाऱ्यांची जात दिसू नये म्हणून नेम प्लेट बदलली पण एस पी साहेब पोलीस दलाची प्रतिमा बदलण्यात तुमची कारकीर्द अपयशी ठरू लागली. गुन्हेगारावर तर वचक राहिलाच नाही ती तर मोकाटच आहेत.पण नुकतीच मिसरूड फुटलेली कोवळी पोरं देखील खिशात चाकू घेऊन फिरू लागली. एवढंच नाही तर एस पी ऑफीस पासून हाकेच्या अंतरावर गजबजलेल्या ठिकाणी खूनही करू लागले. दोन महिन्याहून कमी काळात तब्बल दहा खून हे खाकी वर्दीच्या इज्जतीच्या चिरफाळ्या उडवणारे आहेत.अजूनही वेळ गेली नाही धृतराष्ट्राची व कच्च्या कानाची भूमिका सोडून डोळसपणाने स्टंटबाजी न करता वरिष्ठांच्या भूमिकेत या तरच तुमची कर्तव्यदक्षतेची प्रतिमा जपली जाईल अन्यथा बीडचा भेसूर बनलेला चेहरा बदलता आला नाही म्हणून अपयशाचं खापर फुटायला वेळ लागणार नाही. सध्या तरी “रातभर पाखडलं, काही नाही सापडलं” अशीच स्थिती तुमची बनली आहे.

अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांना बीडला आणण्यात आलं. बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा चेहरा नक्कीच बदलेल अशी अपेक्षा व्यक्तही केली जात होती. सुरुवातीच्या काळात अतिशय चांगलं काम पोलीस दलाच झालं, बीडकर समाधानी झाले. पण थोड्याच दिवसात पोलीस अधीक्षकांकडून स्टंटबाजीचे फतवे निघू लागले. त्यातच जात कुणाला कळू नये म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट बदलण्यात आल्या.आता तर बीड पोलीस मुंबई पोलिसांची बरोबरी करेल का काय? अशी भावना देखील निर्माण झाली.पण ती फोल ठरली. थोड्याच दिवसात गुन्हेगारीने तोंड वर काढले. बीडच्या माध्यमानी जागरूकतेने आवाज उठवायला सुरुवात केली. तर पोलिसावर सत्यतेच्या बातम्यांचा मानसिक दबाव येतो असं नव मानसशास्त्र शोधत पोलिस आणि पत्रकारांमध्ये समन्वय ठेवणारा Beed police press ग्रुप फक्त पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या माहिती पुरताच मर्यादित ठेवला. इथेच धृतराष्ट्राची भूमिका घ्यायला एस पीं नी सुरू केल्याचं लक्षात आलं. माध्यमांच्या बातम्यांची दखल घ्यायची नाही. आपल्याच दिशाहीन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच ऐकून डोळेझाक करायची मग कुरुक्षेत्रावर (बीडच्या भूमीत) सुरू असलेल्या कारस्थानाची कितीजरी माहिती संजय (प्रसारमाध्यमं) ने दिली तरी विश्वासच ठेवला नाही. परिणामी अराजकतेने पुन्हा तोंड वर काढलं. अवैध धंदे प्रचंड वाढले. गुन्हेगारीत तर वाढच होऊ लागली. गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी एम पी डी ए सारख्या कारवाया करण्यात आल्या. दुर्दैवाने त्या सुद्धा वरिष्ठांच्या आदेशापुढे सपशेल फेल ठरल्या. नुसते कागदी घोडे नाचवून वचक बसत नसतो. हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले पण स्टंटबाजीलाच कर्तव्यदक्षता समजणाऱ्या धृतराष्ट्राला समजवणार कोण? मोठमोठे गुन्हे करणारे मोकाट तर आहेच पण आता परिस्थिती इतकी हाताबाहेर जाऊ लागली आहे की, पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. इथेच खरी खाकीच्या इभ्रतीची लक्तर टांगली गेली होती. या घटनेनंतरही बोध घेण्यात आलाच नाही.
गुन्हेगारांकडून गोरगरिबांना होणाऱ्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. स्वतःची चाललेली ईभ्रत राखण्यासाठी एस पीं च्या सुपीक डोक्यातून नवी कल्पना उदयाला आली. स्टंटबाजीचा नवा फतवा काढत मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करणारा वर गून्हा दाखल करण्यात येईल त्यालाही सह आरोपी करण्यात येईल असं जाहीर करत.गुन्हेगारीवर पांघरून घालण्याचं व संविधानाने जनतेला दिलेल्या अधिकारावरच बंधन आणण्याच काम केलं गेलं.
याचीच परीनीती म्हणून आता तर
देशी कट्टे बाळगणारे अनेकजण बीडमध्ये मोकाट फिरू लागले आहेत. नेटकीच ओठावर कोवळी मिसरूड फुटलेली पोरं देखील खिशात चाकू बाळगून फिरू लागले आहेत. जिथे गुन्हेगारावरच वचक नाही तिथे या मुलांचं काय घेऊन बसलात? यातूनच काल एका पत्रकार बांधवांच्या मुलाचा गजबजलेल्या एस पी ऑफिस पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी खून झाला.आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी हाताबाहेर प्रकरण जात आहे. म्हणून एका आरोपीला तात्काळ अटक देखील केली. पण बाकीचे पाच-सहा आरोपी कोण? याचा उलगडा झाला नाही शेवटी यश देवेंद्र ढाका याच्या हत्येतील आणखी आरोपीचा शोध घ्या अन्यथा शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका घेत.बार्शी रस्त्यावर आंदोलन करावं लागलं तेही भर पावसात. दोन महिन्याहून कमी कालावधीत झालेला हा दहावा खून आहे. एस पी साहेब …! देवेंद्र ढाकाच्या मुलाच्या हत्येनंतर मात्र गुन्हेगारीचा कहर झाल्याचं दिसू लागला आहे.

नेमप्लेट बदलण्यासारख्या स्टंटबाजीतून काहीच साध्य झालं नाही.त्यासाठी ग्राउंड वर उतरून काम करावं लागेल. कच्चे कान व धृतराष्ट्राची भूमिका सोडून डोळसपणाने पाहावे लागेल. जनतेचा आक्रोश ऐकावा लागेल इथून पुढे तरी थोडाफार बदल होईल का? “येरे माझ्या मागल्या”अशीच बीडकरांची स्थिती होईल? असेच गुन्हेगार मोकाटच फिरत राहतील का? सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही का? कोवळी पोर गुन्हेगारीच्या मार्गानेच जाणार का? बीड असाच बदनाम होत राहणार का? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles