प्रशासकीय विभागाला तातडीने उपाय योजना करण्याचे दिले निर्देश
बीड — बीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झाले असून आ.संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावून गेले. मंगळवार (दि.२३) रोजी त्यांनी मतदारसंघातील अनेक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली.

मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यासह तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि नागरिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर हे सातत्याने अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करता आहेत. शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करताना पाहावयास मिळत आहेत. शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.शासन दरबारी पत्र व्यवहार करून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी करत आहेत. मंगळवार (दि.२३) रोजी देखील आ. संदीप क्षीरसागर नुकसानीची पाहणी करायला पोहचले. बीड मतदारसंघातील लिंबा-रूई येथे अतिवृष्टीमुळे पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे मुर्शदपूर, लिंबा-रूई, रुई-लिंबा, तांदळवाडी भिल्ल, रुद्रपुर, केतूरा या गावांचा संपर्क तुटला आहे.

बीड तालुक्यातील पारगाव सिरस गावाला भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली. उमरद जहांगीर येथील नदीवरील पूल अतिवृष्टीने वाहून गेला आहे. याठिकाणी देखील आ.संदीप क्षीरसागर यांनी गावकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून प्रशासकीय विभागाला योग्य कार्यवाहीच्या सुचना दिल्या

आ.क्षीरसागरांकडून जलमय झालेल्या धांडे नगर परिसरात पाहणी
आ. संदीप क्षीरसागर हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागासह शहरात देखील अनेक भागात पाहणी करत आहेत. नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन संकटात सापडलेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने मदत करत आहे. बीड शहरातील बार्शी रोडवरील कै. शिवाजी धांडे नगर परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे हा परिसर जलमय झाला आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी धांडे नगर भागात जाऊन नागरिकांशी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांसोबत संपूर्ण परिसरात जाऊन पाहणी केली.पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाढलेली पाणीपातळी कमी करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यास सांगितले.

