माजलगाव — तालुक्यातील टाकरवन जवळील फुलसिंग नगर तांडा येथे अंगणवाडीत शनिवारी सकाळच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने 11 बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीत 29 बालक असून त्यापैकी 7 बालके शनिवारी उपस्थित होते. या अंगणवाडीतील मुलांबरोबर शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी आले होते. खिचडी खाऊन ही मुलं आपापल्या घरी गेली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास अंगणवाडीतील 7 तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 4 मूलांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला.अंगणवाडी सेविका कविता राठोड यांनी सरपंच सुनील तर व उपसरपंच दयानंद बोबडे यांना याची माहिती दिली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. घुबडे यांनी सांगितले.अंगणवाडीत शिकणारी श्रावणी नवनाथ राठोड वय 3 वर्ष, संध्या लखन राठोड वय 5 वर्ष पल्लवी अतुल राठोड वय 5 वर्ष, प्रीतम रवींद्र राठोड, देवांश अजय राठोड (वय 18 महिने रा. फुलसिंग तांडा त्याचबरोबर आर्यन परमेश्वर राठोड वय 4 वर्ष, आरव परमेश्वर राठोड वय 3 वर्ष रा. टाकरवन येथील बालके आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे अक्षर लहू चव्हाण, देवांश अजय राठोड वय 7 वर्ष रा. वारोळा, इशिता देविदास धनगाव वय 7 वर्ष, प्रथमेश दिलीप पवार वय 7 वर्ष व प्रांजल दिलीप पवार वय 8 वर्ष हे सर्व रा. फुलसिंग तांडा येथील रहिवासी आहेत.

