Home Blog Page 98

आर्थिक स्थितीमुळे करुणा मुंडेंना 2 लाखाची पोटगी; कौटुंबिक हिंसाचार झाला नाही — धनंजय मुंडे च्या वकिलाचे स्पष्टीकरण

0

मुंबई — मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून २ लाख रुपये  पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे.धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. असे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिल्या बाबत त्यांनी यापूर्वीच कबुली दिलेली असून, आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचे वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

ऍड.सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुध्दा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार व अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकन पासून दूर रहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम कर्मी याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन ऍड.सायली सावंत यांनी केले आहे.

पोलीस ठाणेच आपल्या दारात;QR Code स्कॅन करा पोलिसात दाद मागा

0

एस पी कांवत यांचा आज पासून संवाद प्रकल्प

बीड — जिल्ह्यात नागरीक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे बहुतांश वेळा त्यांना पोलीस स्टेशनशी संबंधीत काम असेल तर त्यांना पोलीस स्टेशनला पोहचायला बराच वेळ लागतो. त्याच बरोबर पोलीस स्टेशनला पोहचण्यासाठी बस भाडे/स्वतःचे वाहन असल्यास इंधन खर्च या स्वरुपात पैसाही खर्च होतो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बऱ्याच वेळा काम होत नाही. किंवा नागरीकांचे समाधान होत नाही. त्यामुळे नागरीकांना वरीष्ठांकडे दाद मागण्यासाठी दुरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरीकांचे आर्थीक नुकसान तर होतेच परंतु त्याच बरोबर त्यांना शारिरीक व मानसीक हालही होतात.
याच बाबींचा विचार करुन व नागरीकांना चांगली सेवा देण्याच्या भावनेतुन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतुन संवाद प्रकल्प’ हा उपक्रम बीड जिल्हा पोलीस दलात राबवला जात आहे.
यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी QR Code तयार केला आहे. सदरचा QR Code हा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे कक्षात व पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षात लावण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या मोबाईल द्वारे सदरचा QR Code स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे स्क्रिन वर एक लिंक येईल. ती लिंक उघडल्यानंतर एक माहीतीचा फॉर्म येईल. त्यामध्ये नागरीकांना स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, ज्या पोलीस ठाण्याच्या संबंधी काम आहे त्या पोलीस ठाण्याचे नाव निवडणे,पोलीस ठाणे येथे भेट देण्याचे कारण किंवा माहिती, पोलीस ठाणे येथे भेट दिल्यानंतर किंवा पोलीस ठाण्याच्या कामकाजावर आपण समाधानी आहात काय?, समाधानी/असमाधानी असल्याचे कारण, तुम्ही दिलेली भेट यावरुन पोलीस ठाण्यास किती गुण द्यायचे? (गुण 1-5), सुधारणेसाठी सुचना.

सदरची माहीती भरुन ती सबमीट करणे आवश्यक राहील. एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यास त्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन 24 तासांच्या आत समस्या जाणुन घेवुन समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. सदरचा QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुद्धा नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरीकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहीती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहीती देवु शकतात. अशा व्यक्तींचे नांव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल. तसेच याद्वारे नागरीकांना त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या QR Code द्वारे देवु शकतात. नागरीकांनी केलेल्या तक्रारी, दिलेल्या प्रतिक्रीया, सुचना ह्या पोलीस अधीक्षक हे स्वतः पाहु शकणार आहेत. तसेच नागरीकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलीसांकडुन घेतली जाणार आहे.
या उपक्रमांद्वारे पोलीस आणि नागरीक यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. यापुढे नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. यामुळे नागरीकांचा वेळ व पैशांचा होणारा अपव्यय टाळता येणार आहे. सदरचा उपक्रम हा नागरीकांच्या सेवेसाठी राबविण्यात येत आहे.

‘ संवाद प्रकल्प’ हा उपक्रम आज दि. 6 फेब्रुवारी 2025 पासुन बीड जिल्ह्यात राबवीला जात आहे. सदर उपक्रमाचा नागरीकांनी योग्य उपयोग करुन पोलीस व नागरीकांमध्ये निर्माण झालेली दरी दुर करावी. तसेच नागरीकांनी सुचवीलेल्या सुधारणांचे स्वागत केले जाईल असे मत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी व्यक्त केले आहे.

कराड मुंडे विरोधातील बातम्या पाहणाऱ्या तरुणास लोखंडी रॉड ने बेदम मारहाण

0

केज — धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या विरोधातील बातम्या मोबाईलवर बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देत दोन युवकांनी एकास लोखंडी रॉडसह कोयत्याने बेदम मारहाण केल्याची घटना तरनळी येथे घडली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या अशोक शंकर मोहिते असं तरुणाचं नाव आहे. त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचार सुरू आहेत. ही घटना केज तालुक्यातील तरनळी येथे बुधवारी (दि.५) दुपारी घडली. याप्रकरणी जखमीचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अशोक मोहिते हे तरनळी येथील रमाई चौक येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोबाईलवर वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातम्या पाहत होते. ही बाब मोटरसायकलवरून आलेल्या वैजनाथ भारत बांगर , अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी मोहिते यांच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. यापुढे वाल्मिक कराड व मुंडे यांच्या विरोधातील बातम्या पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिली. जखमी अशोक मोहिते यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit Polls : 27 वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार की भाजपच्या स्वप्नावर आप झाडू फिरवणार?

0

नवी दिल्ली — विधान सभेचे मतदान आज 5 फेब्रुवारी रोजी पार पडलं. या निवडणुकांचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध संस्था आता एक्झिट पोल जाहीर करताना दिसत आहेत.

त्यामुळे आता कोणता पक्ष बाजी मारणार? याबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलही अंदाज बांधले जात आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये काय अंदाज व्यक्त केले आहेत त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया.

दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पार्टीची सत्ता असलेली बघायला मिळत आहे. ‘आप’ पक्षाने आजवर 2013, 2015 व 2020 या वर्षांमध्ये दिल्लीत वर्चस्व मिळवले आहे. मात्र यावेळी भाजपदेखील सत्तेत येणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. मॅट्रीजने समोर आणलेल्या सर्वेक्षणामध्ये भाजपला 35 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच आपला 32 ते 37 जागा आणि काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळे आता पर्यंत अनेकांनी भाजपा पक्ष सत्तेत येण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत. तसेच ‘पीपल्स पल्स’नुसार, भाजप 51 ते 60 जागांवर आघाडी मिळवू शकते तर, ‘आप’ला 10 ते 18 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमानणे पोल ‘डायरी’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 42 ते 50 , ‘आप’ पक्षाला 18 ते 25 जागा तसेच काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे

2013 साली ‘आप’पक्षाने दिल्लीत यश मिळवले होते. तसेच 2020 साली ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. केंद्रात सत्ता असूनही दोन वेळा दिल्लीत पराभव सहन करावा लागल्यानंतर यावेळी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजपचं कमळ खुलणार का? असे प्रश्नदेखील जनतेच्या मनात उभे राहिले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मादळमोहीच्या शिक्षकाचा असाही धंदा; शिक्षण विभागाचा कारभारच नंगा

0

बीड — मादळमोहीच्या एका शिक्षकाने छत्रपती संभाजी नगरची संस्था विकत घेतली. एवढ्यावरच कारभार थांबला नाही तर तिथले विद्यार्थीही बीडच्या शाळेत आणल्याचा प्रकार घडल्याने शिक्षण विभागाचा कारभार किती नंगा आहे हे समोर आल्याने खळबळ माजली आहे.

शिक्षकी देशातले काही शिक्षक ‘अजीम’ ओ शान शहेनशहा समजून नसते धंदे करत काळीमा फासण्याचा काम करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये देखील घडला आहे. मादळमोही येथे शिक्षक असलेल्या महाभागाने छत्रपती संभाजीनगर येथील एक शिक्षण संस्था खरेदी केली. ती नुसती खरेदीच केली नाही तर मुलांच्या भवितव्याशी खेळ मांडला. छ.संभाजीनगरच्या संस्थेत ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होता तेच विद्यार्थी बीडमध्ये संस्था आणल्यानंतर देखील शाळेच्या हजेरी पटावर आले गेले. वास्तविक पाहता संस्था विकत घेतल्यानंतर व तिचे स्थलांतर करताना त्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना देणे आवश्यक होतं. छ.संभाजीनगर येथील एखाद्या शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं गरजेचं होतं. मात्र सध्या विद्यार्थी राहायला छत्रपती संभाजी नगर मध्ये आहेत. त्यांचे प्रवेश बीडच्या संस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ या शिक्षकाने मांडला आहे. एवढ्यावरच हे कृत्य थांबलं नाही तर बीडचे काही शिक्षक मोठी रक्कम घेऊन संस्थेत भरती केले. त्यांना दोन-तीन महिने अल्प प्रमाणात का होईना वेतनही देण्यात आले. मात्र भरमसाठ पैसा घेऊन देखील आता या संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या हातावर छदाम देखील‌ या संस्थाचालक शिक्षकाने दिला नाही. परिणामी शिक्षकांच भवितव्य ही टांगणीला लागला आहे. उपासमार होत असली तरी बोलावं तर “बाबाही गेल्या अन् दशम्याही गेल्या” अशी वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर नोकरी ही जाईल तसेच संस्थाचालकाला दिलेला पैसाही पुढील अशा कात्रीत या स्थलांतरित संस्थेतील शिक्षकांची स्थिती झाली आहे. एवढा प्रताप मादळमोहीच्या शिक्षकाने करून देखील याची दखल शिक्षण विभागाने अजून घेतलीच नाही. घेणार की असाच या शिक्षकाचा नंगा नाच चालू राहणार? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं मातेर होणार? संस्थेत भरती झालेल्या शिक्षकांची स्वप्नदेखील धुळीला मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण विभागाने कमीत कमी छ.संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तरी विचार करून कारवाई करावी. त्या संस्थाचालक शिक्षकाला देखील आळा मोळा घालावा अशी मागणी होऊ लागली आहे.

बोगस विमा प्रकरणात 96 सीएससींवर कारवाई,22 आयडी एकट्या परळीतील

0

मुंबई — प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विमा पोर्टलवर बोगस विमा भरण्यात आला होता. भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएससींचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील 35, तर 22 हे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमधील आहेत.

बीड जिल्ह्यातील शासकीय जमीन शेत दाखवून काहींनी बनावट पीक विमा भरल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर राज्यभरातील पीक विमा पडताळणीला सुरुवात झाली होती.
राज्यातील इतर जिल्ह्यातही असा प्रकार आढळून आला होता. परभणी जिल्ह्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरला होता. कोणतेही भौगोलिक क्षेत्र अस्तित्वात नसताना तेथे खोटे सातबारा, आठ-अ सारखे महसुली अभिलेख तयार करून एकूण 96 सीएससी आयडीधारकांच्या आयडीमधून पीक विमा
नोंदणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे सदरील 96 सीएससी आयडी ब्लॉक करण्याची सूचना कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सीएससी कंपनीला केली होती.

बीड जिल्ह्यात 35 आयडी

बनावट पीक विमा भरणारे 35 सीएससीधारक हे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी 22 जणांचे सीएससी आयडी हे परळी शहर व तालुक्यातील आहेत. उर्वरित अंबाजोगाईतील 6, बीडमधील 1 व इतर 6आयडीधारक हे इतर तालुक्यांतील असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

इतर राज्यांतील 7 आयडी

महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 7 सीएससीधारक हे इतर राज्यांतील आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील 2, बंदा जिल्ह्यातील अत्तारा येथील 1, हरदोई जिल्ह्यातील 2, तर हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील 2 यांचा समावेश आहे. बनावट पीक विमा भरणाऱ्या लोकांचे विमा प्रस्ताव विमा कंपनीने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास 1 लाखापेक्षा अधिक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. आणखी काही बनावट प्रस्ताव असतील तर रद्द केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातील ठेवीदारांचा आक्रोश मोर्चा

0

सचिन उबाळेंच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांचा मोर्चा

बीड — ज्ञानराधासह दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढून शासन आणि प्रशासनाला जाब विचारला.
अर्चना कुटेंसह फरार असलेल्या इतर मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व इतर संचालकांना
तात्काळ अटक करावी, मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या तपासाची माहिती ठेवीदारांना द्यावी अशी मागणी यावेळी ठेवीदारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. ठेवीदारांचा जीव घेणाऱ्या व्यवस्थेचा यावेळी ठेवीदारांनी धिक्कार केला.
बीड येथे ठेवीदार संघर्ष कृती
समितीचे राज्य मुख्यप्रवर्तक तथा स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातील ठेवीदारांनी मोर्चा काढला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे
चौक, छत्रपती शिवाजी चौक-नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेटसह जिजाऊ मल्टीस्टेट, शुभकल्याण, लक्ष्मीमाता, मातोश्री अर्बन, मराठवाडा अर्बन (माजलगाव) या आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमुळे ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात, फरार असलेल्या अर्चना कुटेला तात्काळ अटक करावी यासह अन्य मल्टीस्टेटच्या अध्यक्ष, संचालकांना बेड्या ठोकाव्यात आणि मल्टीस्टेट, पतसंस्थांच्या तपासाची माहिती ठेवीदारांना द्यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. प्रचंड उन्हात जिल्हाभरातील ठेवीदार मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच – धनंजय मुंडे

0

अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे; धनंजय मुंडे यांच्याकडून दमनियांचा प्रथमच समाचार

त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा – मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला

५९ दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल सुरू, खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे व बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम, त्यांना माझ्या शुभेच्छा

अंजली दमानिया यांचे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप खोडून काढत मुंडेंनी केला खुलासा, त्या खरेदीच्या दरांमध्ये कुठेही तफावत नाही

ऑफिस ऑफ प्रॉफिट सारखे अनेक खोटे व चुकीचे आरोप करून केवळ आमची, आमच्या जिल्ह्याची आणि बहुजन समाजाची बदनाम केली – धनंजय मुंडे

मुंबई  — अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नॅनो युरिया, डीएपी, प्रेयर पंप, कापूस बॅगा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावली आहेत

मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत असे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

मागील 59 दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल केली जात असून वेगवेगळे चुकीचे व खोटे आरोप करून केवळ आणि केवळ आमची बदनामी केली जात आहे असे म्हणतानाच धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढले.

मुळात देशाचे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी नॅनो खतांच्या वापरावर भर देण्याबाबत सूचना केलेले आहेत त्याचे पालन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नॅनो खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात भर पडते म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खते वापरावीत असा माझा भर होता.

नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही दोन्ही शासनाने खरेदी केलेली खते इफको या कंपनीने बनवलेले असून त्या कंपनीचे दर कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात सर्वत्र सारखेच आहेत त्यामुळे या दरांमध्ये तफावत होती आणि त्यातून अमुक कोटींचा घोटाळा झाला असे बोलणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

त्याचप्रमाणे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदी करताना काही कंपन्या काही राज्यांमध्ये जे फवारणी पंप पुरवतात त्यांना सहा महिन्यांची वॉरंटी व त्या आतील दुरुस्ती देतात मात्र महाराष्ट्र शासनाने फवारणी पंप खरेदी करताना किमान एक वर्ष वॉरंटी दिली जावी व त्यातील दुरुस्तीचा खर्च संबंधित कंपनीने करावा अशा प्रकारचे फवारणी पंप संपूर्ण निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक रीतीने राबवूनच खरेदी केले असून संबंधित चारही प्रकारच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावे यासाठी संबंधित निविदाना दोन वेळा मुदत वाढ सुद्धा देण्यात आली होती असेही मुंडेंनी स्पष्ट केले.

ज्या काळात हे सर्व घडले त्या काळामध्ये कापसाचे भाव पडलेले होते त्यामुळे सहसा शेतकरी कापूस विकायला तयार होत नव्हते मात्र घरामध्ये पडून राहिल्याने कापसाबरोबरच शेतकरी कुटुंबांना सुद्धा विविध संसर्गजन्य आजाराची लागण होऊ लागल्याने कापूस भरून ठेवण्यासाठी बॅगा देण्याची मागणी समोर आली तेव्हा भारत सरकारच्या कंपनीकडून प्रमाणित असलेल्या दरानेच केंद्र सरकारच्या कंपनीकडूनच संबंधित खरेदी करण्यात आल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

मान्सून च्या सुरू होण्याच्या अगोदर पेरणी आणि पेरणी उत्तर कामाची तयारी शेतकऱ्यांना करून ठेवावी लागते. मधल्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागणार होती त्यामुळे सदर प्रक्रिया ही मार्च महिन्यातच राबवण्यात आली. संपूर्ण कल्पना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना होती व संपूर्ण प्रक्रिया ही त्यांच्या पूर्वपरवानगीनेच पार पडलेली आहे. मात्र शेतीच्या मशागतीतील आणि शेतकऱ्यांची संबंधित कोणत्या गोष्टी कधी केल्या जाव्यात तसेच काय केले पाहिजे याचे कदाचित अंजली दमानिया यांना माहिती नसावी असेही धनंजय मुंडे म्हणाले.

अंजली दमानिया यांनी आजवर वेगवेगळ्या नेत्यांवर अनेक आरोप केले, परंतु त्यात पुढे काय झाले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

प्रत्येक प्रकरणांमध्ये अंजली दमानिया ह्या केवळ न्यूज व्हॅल्यू मिळवण्यासाठी आणि विशिष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी काहीही खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि कॅमेऱ्यासमोर येतात. बीडच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा त्यांनी एन्ट्री घेतली तेव्हा त्यांनी तीन आरोपींची नाव घेत या आरोपींची हत्या झाली आहे अशी बतावणी करत सणसणाटी निर्माण केली होती. त्यांनी अशा पद्धतीच्या खोट्या आणि तपासाची दिशाभूल करणाऱ्या गोष्टी का पसरवल्या याबाबत आजही कोणी त्यांना एक शब्द विचारायला तयार नाही, याबाबत धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

दरांच्या बाबतीत एक याचिका उच्च न्यायालय स्तरावर

अंजली दमानिया यांनी केलेल्या खोट्या आरोपांच्या नुसारच एका पुरवठादार ठेकेदाराने आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हवे असलेल्या दरांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र सदर प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीला आल्यानंतर सदरील दरांमधील वस्तुस्थिती समजल्यानंतर त्या ठेकेदाराने संबंधित वस्तूंच्या दरांच्या अनुषंगाने केलेल्या सर्व मागण्या संबंधित याचिकेतून मागे घेतल्या आहेत.

ऑफिस ऑफ प्रॉफिट बाबतही खुलासा

अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट च्या नावाखाली केलेले आरोप देखील पूर्णपणे चुकीचे आणि खोटे असून माझ्याशी संबंधित असलेली व्यंकटेश्वरा ही कंपनी थर्मल पावर स्टेशन अर्थात महाजनको कडून एक रुपये ही कमवत नाही हे रेकॉर्डवर आहे कंपनीच्या बॅलन्स शीट व बँक अकाउंट स्टेटमेंट वरती सुद्धा आहे. हे अंजली दमानीयांना सुद्धा माहित आहे. थर्मल मध्ये कोळशामुळे तयार झालेली राख ही तळ भरून साठवू न देता ती घेऊन जावी व इतर उद्योगांना वापरावी अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे आहेत. थर्मल पावर स्टेशनच्या राखेमुळे आमच्या भागात सिमेंट कंपनी आली, रोजगार मिळाले. सिमेंट कंपनीला कोणी राख पुरवली आणि होणारे प्रदूषण कमी केले तर त्यात ऑफिस ऑफ प्रॉफिट कसले आले? माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या कंपनीने महाजनको कडून एकही रुपया कमावला नाही. मात्र तरीही मागील 59 दिवसांपासून सातत्याने खोटे आरोप करून आमची मीडिया ट्रायल केली जात आहे. त्याद्वारे माझ्यासह बीड जिल्ह्याची आणि बहुजन समाजाची सुद्धा बदनामी केली जात आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचा अंजली बदनामी या असा उल्लेख करत खोचक टोला लगावला.

रोज एका नवीन प्रकरणाचा आधार घेऊन खोटे आणि धादांत चुकीचे आरोप करून मीडिया ट्रायल करून आमची बदनामी करण्याचे काम कोणीतरी अंजली बदनामिया यांना दिले असून हे काम करण्यासाठी त्यांना तसेच ज्यांनी काम दिले आहे त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणायलाही धनंजय मुंडे विसरले नाहीत.

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आता ट्विट केले आहे.

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावा

0

महसूल, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषदेची आढावा बैठक

बीड — बीड मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी या विभागांशी निगडित नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्‍यांना दिले.
मतदारसंघातील सामान्य लोकांची सरकारी कार्यालयात अडकलेली कामे तसेच जनसामान्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच विभागांतर्गत होत असलेले कामकाज यांचा आढावा घेण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.४) रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदी विभागांचा आ.क्षीरसागर यांनी आढावा घेतला. यावेळी या विभागांशी संबंधित नागरिकांच्या असलेल्या तक्रारी यांचा निपटारा करण्याबात आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच‌‌ आ.क्षीरसागर यांनी या विभागांतर्गत झालेल्या आणि होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के‌ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

0

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा.श्रीहरी शिवाजीराव काळे यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री सातच्या सुमारास माजलगाव पाथरी महामार्गावरील खरात आडगाव फाटा येथे घडली

प्रा.श्रीहरी काळे वय 47 वर्ष आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभास सकाळी मोटारसायकलवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जि. प. सदस्य डॉ.भगवान सरवदे होते. लग्न समारंभ उरकून परभणीहून माजलगाव कडे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून येत होते. दरम्यान खरात आडगाव फाट्यावर चहा घेण्यासाठी मोटार सायकल थांबवली.यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ.सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने काळे यांना जोराची धडक दिली. तर दुसऱ्या बाजूने दुचाकीवरून उतरणारे डॉ.सरवदे हे सुखरूप बचावले. अपघातानंतर स्थानिकांनी काळे यांना तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.