Home Blog Page 73

ऊस दर वाढीसाठी शेतकरी आंदोलन पेटले; कारखान्यांचे गाळप ठप्प

0

बीड — ऊसदर वाढवून देण्याच्या मागणीसाठी बीड सह परभणी जिल्ह्यात शेतकरी आंदोलने होत असून, शनिवारी पाथरीमध्ये रास्तारोको तर आंदोलनाला पाठिंबा म्हणून ऊसतोड कामगारांनी कोयता बंद ठेवला असून, वाहनधारकांनी वाहतूक करण्यास नकार दिल्याने हंगामाच्या नमनालाच अनेक साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील असंख्य गावातील शेतकरी यांनी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीला पाठींबा देत शेतकऱ्यांनी आपली ऊस तोड व ऊस वाहतूक थांबवली आहे. यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने समितीत सामील होऊल पेक्षा अधिक वाहनाद्वारे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांना भेटी देत आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कारखानदारांनी कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. ऊस दर बाबत कोणताही निष्कर्ष निघाला नसल्याने ऊस आंदोलन चिघळले आहे. बीड जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वाहनांच्या ताफ्याद्वारे जिल्ह्यातील ओंकार शुगर्स पांगरी, अंबा साखर अंबाजोगाई, येडेश्वरी शुगर्स केज, गंगा माऊली शुगर्स केज या ठिकाणी ल शेतकरी समितीने भेटी देऊन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने ऊसासाठी प्रत्येक टनासाठी ३ हजार ५५५ रुपये दर १०.२५ रिकव्हरीला जाहीर केला आहे. आपणाकडे ११ किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी रिकव्हरी लागत आहे, असे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अजय बुरांडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षात घेता प्रती टन ३ हजार रू. पहिली उचल तर ४ हजार रु. अंतिम दर मिळाला पाहीजे ही मागणी निवेदने करून केली. याबाबत जिल्हाधिकारी, बीड व साखर सहसंचालक छ. संभाजीनगर विभाग यांना देखील कळवण्यात आले आहे, असे ॲड. बुरांडे म्हणाले.

ऊस उत्पादक संयुक्त कृती समितीने सुरू केलेल्या या आंदोलनास विविध ऊस तोड कामगार संघटना, विविध गावातील ग्राम पंचायत, सेवा सहकारी सोसायटी यांनी ठराव मंजूर करत पाठिंबा दिला असून ऊस प्रश्नी पेटलेले हे आंदोलनाबाबत साखर कारखानदारांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास हे आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र स्वरूप घेऊन जन आंदोलन होईल असे कृती समितीकडून सांगण्यात येत आहे.

आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार !

0

मुंबई — आगामी जिल्हा परिषद निवडणुका २ टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १५ जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका होतील. तर ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये नव्यानं सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही. निवडणुका दिलेल्या वेळेत होतील, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. यावेळी मात्र ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची अट सरन्यायाधीशांनी घातली. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पार केलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग विचार सध्या करत असल्याची माहिती समोर आली आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ५० टक्के आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या १५ जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका घेण्यात येतील. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भातील सरन्यायाधीश सूर्य कांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने अधिसूचना काढलेल्या २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती न दिल्यामुळे ठरल्याप्रमाणे या निवडणुका होतील.

निवडणुका अडचणीत आलेल्या १७ जिल्हा परिषदांमध्ये नंदूरबार, पालघर, गडचिरोली, धुळे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलडाणा यांचा समावेश आहे. या सर्व जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्पात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या व २९ महापालिकांमधील निवडणुकीची अधिसूचना अजून काढलेली नाही. मात्र त्याबाबत निवडणूक आयोगानेच निर्णय घ्यावा, अशी मोकळीक सरन्यायाधीशांनी दिली.

योगेश भैया…!बीडची जनता दुधखुळी ? गृहीतकाच्या “पप्पू” राजकारणाला कशी पडणार बळी ?

0

बीड — मुस्लिम मतांमध्ये फूट, ब्राह्मण मारवाडी दावणीलाच बांधलेला, ओबीसी तर आपलाच, मराठा समाज दोन्ही राष्ट्रवादीत विभक्त होणार गल्ली ते दिल्ली आपलीच सत्ता, बीडची जनता निव्वळ दूधखुळीच, उगाच 35 वर्ष सत्ता आपल्याला दिली नाही. या अशाच गृहीतकाच्या “पप्पू” राजकारणामुळे विधानसभेत जनतेने फटका देऊनही पुन्हा नगरपालिका आपलीच असं म्हणत “राष्ट्रीय पक्षाच धरलं बोट तिथेच दिसली नियतीतली खोट” असं म्हणताना जनतेने देखील योगेश क्षीरसागर कडे पाठ फिरवत आहे.
धर्मनिरपेक्षतेची कौटुंबिक परंपरा चालवणारे योगेश क्षीरसागर अचानक धार्मिक राजकारण करणाऱ्या पक्षात जाऊन भविष्यात पक्ष धोरणानुसार गरळ ओकणार नाहीत याची शाश्वती कोणीच देणार नाही. शेवटी स्वार्थाच राजकारण महत्त्वाचं बीडची जनता दुधखूळीच ती आपल्या मागे येणारच उगाच 35 वर्ष जनतेने नगरपालिकेचे सत्ता दिली नव्हती. ती आताही देणारच याचा ठाम विश्वास बीडकरांचा बळी गेला तर गेला. आपण भले आपलं स्वार्थी राजकारण भले एवढाच फंडा योगेश क्षीरसागरांनी वापरला. स्वार्थासाठी एका क्षणात धर्मांध पक्षाचं बोट धरताना गणित ही विजय मिळणारच अशी मांडली. बीडच्या राजकारणात एमआयएमच्या प्रवेशाने मुस्लिम मतं एम आय एम कडेच जाणार , ब्राह्मण मारवाडी तर भाजपच्या दावणीला बांधलेला आपल्याही तो हक्काचाच! ओबीसी मतं देखील आपलीच मराठा समाजाची मतं दोन्ही राष्ट्रवादीत विभक्त होणार तोडा फोडा राज्य करा या नीतीचा फायदा आपल्याला नक्कीच होणार? बीडच्या जनतेला कळतचं काय? आपण नगरपालिकेचे राजकुमार जनता आपल्यालाच कौल देणार! जनता लोकशाहीत नाही तर आपल्याच राजेशाहीची मांडलिक आहे.असं मांडलेलं गृहीतक बीडच्या जनतेला मात्र रुचलं नाही. ब्राह्मण आपलेच ते कुठेच जाणार नाहीत असं ग्राह्य धरून त्यांना रामराम घालायची देखील गरज नाही. असं म्हणत योगेश क्षीरसागरांची प्रचाराची मोहीम अगदी जोरात सुरू आहे.तीच स्थिती मारवाडी समाजाची देखील आहे. भाजपचा मूळचा कार्यकर्ता तर सतरंज्या उचलायला जन्माला आला आहे. त्यामुळे मिळत असलेली हीन भावना असंतोषाला कारणीभूत ठरत आहे.
मुस्लिम परिसरात सभा घेतली की ते आपोआपच एम आय एम कडे जाणार यासारखी गणित मांडून बुद्धिबळाचा “पप्पू” पट योगेश क्षीरसागरांनी खेळायला सुरुवात केली आहे.
बीडची जनता देखील “वस्ताद” आहे. डोक्यावर घेण्याची जनतेची ताकत आहे तर पायाखाली घेण्याची देखील तयारी ठेवली जाते. हा कौटुंबिक इतिहास गृहीतकाच्या राजकारणात योगेश क्षीरसागर पार विसरले. त्यांचेच काका जयदत्त क्षीरसागर या इतिहासाचे ज्वलंत साक्षीदार आहेत. त्यांना मानणारा वर्ग मोठा असला तरी धर्मांध पक्षाला जयदत्त क्षीरसागर देत असलेली साथ त्यांच्या सहकार्यांना देखील पटलेली नाही. जन्मभर भाजपच्या नावाने खडे फोडले आता कुठल्या तोंडाने भाजपला मत मागायची असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. तो सहाजिकच आहे.
जनतेने दिलेल्या फटक्यामुळे राजकारणाचा सूर आजही त्यांना गवसण अवघड चालल आहे. हे मात्र लक्षात घेतलं गेलं नाही. विधानसभेत बीडच्या जनतेने योगेश क्षीरसागर यांना याची चुणूक दाखविली. मात्र नगरपालिका आपली जहागिरी आहे ती आपल्याच ताब्यात जनता देणार हा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशानंतर आलेली उत्साहाची लाट ओसरली आहे. जनतेमध्ये नाराजीचा उमटत असलेला सूर बडवायला लावणार आहे उर असं म्हणण्याची वेळ आली आहे.

अजित पवार यांची बीडमध्ये  जाहीर सभा

0

श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ

बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जाहिर सभेचे आयोजन बीड येथे करण्यात आले असून यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्यासह सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ना. अजितदादा पवार यांनी आपल्या जाहिर सभेत विकासाचे व्हिजन मांडल्यामुळे बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यासह मतदारांमध्ये उत्साह भरला होता. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ना. अजितदादा पवार यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरातील बशीरगंज चौक येथे आज सायं. ५.३० वाजता होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेने राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदासह सर्व ५२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या विजयावर शिक्का मोर्तब होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून या जाहिर सभेस बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित, डॉ.ज्योतीताई मेटे, अनिलदादा जगताप, खमरूल इमान यांच्यासह कल्याणराव आखाडे, दिलीप गोरे, शेख मुजीब, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, बळीराम गवते, अशफाक इनामदार, झुंजार धांडे, शेख निजाम, भिमराव वाघचौरे, विनोद मुळूक, बाळासाहेब गुंजाळ, रामसिंग टाक, विनोद हातागळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शिवेसना-शिवसंग्राम-सपा आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरच होणार – सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडत आहे, या प्रकरणी आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही निवडणुकीवर स्थगितीचा आदेश दिलेला नाही. अंतिम निर्णय 21 जानेवारी 2026 रोजी दिला जाणार आहे. तोपर्यंत या निवडणुका न्याय प्रविष्ठ राहील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले आहे की, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेतच होणार आहेत. 57 नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम निर्धारित वेळेत होईल, मात्र येथील निवडणूक ही न्याय प्रविष्ठ असणार आहे. 21 जानेवारी 2026 रोजी यावर अंतिम निर्णय येईल, तो निर्णय या नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बांधील असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंबंधी मे महिन्यात झालेल्या सुनावणीनंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे. आजच्या न्यायालयाच्या निर्देशामुळे आता राज्य निवडणूक आयोगाला निर्धारित वेळेत निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असतानाच या निवडणुकीमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याचा मुद्दा समोर आला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यामुळे या निवडणुकांचे भवितव्य टांगणीला लागले. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. निवडणुका स्थगित न करता निवडणुकीचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देताना सरन्यायाधीस सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या खंडपीठाने ज्या 40 नगर परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली त्यांचा निकाल न्यायप्रविष्ट राहील असे आदेश दिले.

या प्रकरणी पुढील सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होईल, असेही आज कोर्टाकडून सांगण्यात आले. त्यामुळे 21 जानेवारी रोजी होणारी सुनावणी ही त्या पद्धतीने सूचीबद्ध करण्याचे प्राथमिक निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मागील पाच ते सात वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झालेली नाही. त्यामुळे आता निवडणुकीला स्थगिती मिळाली तर पुन्हा निवडणुकीवर टांगती तलवार राहण्याची शक्यता न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर खंडपीठाने नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार घेण्यास परवानगी दिली आहे.

ज्या 40 नगर परिषदा आणि 17 नगर पंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक आहे, त्यांचा निकाल या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील अर्थात निकाल न्यायप्रविष्ट असेल.

ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यात अनेक वर्षांपासून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सध्या निर्माण झालेला आरक्षण मर्यादेचा वाद फक्त नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्येच आहे. त्यामुळे इतर महापालिकांची निवडणूक टांगणीला लावून ठेवणे योग्य होणार नाही, असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला. त्यानंतर खंडपीठाने उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे स्वातंत्र्य असेल, असे निर्देश दिले. मात्र, या संस्थांमधील आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांहून अधिक नसावे. ही अट देखील प्रकरणाच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल.

योगेश भैया…! निवडणुकी पुरतच दारात जायचं अन् मत मागायचं विधानसभेसाठी तुम्हाला नाकारलं मग पालिकेत का स्वीकारायचं ?

0

बीड — स्व. काकूंची धर्मनिरपेक्ष शिकवणं मातीमोल करून स्वार्थाच्या राजकारणासाठी पक्ष बदललेल्या डॉ. योगेश क्षीरसागर यांना विधानसभा निवडणुकीत यापूर्वीच जनतेने नाकारलं आहे. ज्यांचं बोट धरून भाजपात प्रवेश केला त्यांना देखील लोकसभेत बीडकरांनी घरची वाट दाखवली. योगेश भैया…! तुम्हीच सांगा निवडणुकी पुरतचं दारात जायचं अन् मत मागायचं एरवी घरात बसायचं मग बीडकरांनी तुम्हाला व तुमच्या उमेदवाराला का स्वीकारायचं ? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.
स्वार्थाच राजकारण किती करायचं याला देखील मर्यादा असतात.ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. योगेश क्षीरसागर सक्रिय झाले. उमेदवारी मिळावी यासाठी जंग जंग पछाडली. उमेदवारी मागण्यासाठी मोठ्या राजकीय कुटुंबात जन्म घेतला पैसा खर्च करण्याची धमक होती. एवढीच काय ते पात्रता होती. समाजकारण राजकारण याचा फारसा गंध त्यांना नव्हता.परिणामी ऐन निवडणुकीच्या मैदानात हाबुक ठोकून उतरले असले तरी जनतेने त्यांना घरीच बसवणं पसंत केलं. निवडणुका संपल्या नंतरच्या कालावधीत तरी समाजकारण करून जनतेशी नाळ जोडायला पाहिजे होती. शांततेच्या काळात युद्धाची तयारी करावी लागते म्हणतात. त्यावेळी योगेश क्षीरसागर काही महिने विजनवासात राहिल्यासारखे समाजापासून अलिप्त राहिले. कधीतरी एखादं पत्रक काढायचं शहरात होत असलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं. एवढाच फंडा त्यांनी सुरू केला होता. विशेष म्हणजे अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसानीच्या काळात देखील ते फारसे जनतेत मिसळलेले दिसले नाहीत. बांधकाम विभागाचे अधिकारी घरी बोलवायचे. टेबल पुढे उभे करून स्वतः खुर्चीवर बसायचं व आपण कसे जनतेसाठी काम करत आहोत. आपल्याच आदेशाने कशा यंत्रणा हलतात मला जनतेची किती काळजी आहे. याचा भ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना उभे करून आदेश द्यायला योगेश क्षीरसागरांकडे कुठलंच संवैधानिक पद नव्हतं. मग त्यांनी त्यावेळी काढलेल्या बातम्यांच्या माध्यमातून दाखवलेला मुजोरपणा जनतेला आवडला नाही. या पलीकडे फारसं काम त्यांच्याकडून झालं नाही.
न.प.निवडणूकीच बिगुल वाजताच योगेश क्षीरसागर तंद्रीतून जागे झाले.35 वर्ष आपल्याच घरात सत्ता राहिली आहे आपण बीडचे राजकुमार आहोत अशा अविर्भावात निवडणुकीच्या तयारीला लागले. त्यांची ही स्वार्थी मानसिकता अजित पवारांना आवडलीच नाही. त्यांनी सरळ नाकारण्याची भूमिका घेतली. त्यानंतर
लगेच आपल्यावर खूप काही अन्याय झाला आहे.अस दाखवत सहानुभूती मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत भाजपची वाट धरली. भाजपच्या उत्साहाला इतकी उकळी फुटली की त्यात मग्रूरीचा उत मात चूलीला विझन पडण्याच्या स्थिती निर्माण झाली. हे सगळं पक्ष बदल करत असताना योगेश क्षीरसागर यांनी स्व. काकूंनी दिलेली धर्मनिरपेक्षतेची शिकवण एका क्षणात पायदळी तुडवली. यामध्ये क्षीरसागर कुटुंबीयांशी नाळ जोडला गेलेला प्रत्येक जाती-धर्माची लोक तुटली गेली. याचा विसर मात्र स्वार्थी राजकारणात योगेश क्षीरसागर यांना पडला.
स्व. काकूंच्या शिकवणीवर ठाम राहायचंच एवढं जरी ठरवलं असतं वेगळी आघाडी स्थापन केली असती तर कदाचित जनतेने डोक्यावर घेतला असतं. तीच बीडची जनता पुन्हा पायदळी तुडवायला मागे पुढे पाहणार नाही अस सध्याचं तरी चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. जनतेने विधानसभा निवडणुकीत का नाकारलं याच एकदा अवलोकन जरी केला असतं तरी त्याचा फायदा झाला असता. बरं ज्याचं बोट धरून भाजप प्रवेश केला त्यांच्या जीवावर नगरपालिकेची सत्ता आपल्याच हातात येणार याचा कैफ (धुंदी) डोक्यात चढला आहे.त्या नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीत बीड शहराच्या जनतेने सपशेल नाकारलं होतं. याचा विसर मात्र योगेश क्षीरसागर यांना पडलेला आहे. बीडच्या जनतेला वेड्यात काढण्याचा धंदा जनता हाणून पाडणार असं एकंदर निवडणुकीचं वातावरण असल्याचं राजकीय जाणकार सांगू लागल्या आहेत.

नरेगा वर्क कोड डिलीट; लाभार्थ्यांसाठी तातडीने उपाययोजनांची मागणी

0

 लाभार्थ्यांनी तात्काळ पंचायत समिती येथे कागदपत्रांसह संपर्क साधावा

बीड  —  नरेगा योजनेअंतर्गत राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व प्रकारच्या कामांचे वर्क कोड डिलीट झाल्याने लाभार्थ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये कामे थांबली असून मजुरांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत. या गंभीर प्रश्नी तातडीने कार्यवाही करून निलंबित कामे सुरू करणे व मस्टर तात्काळ चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठीचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली  सतीश शेळके पाटील यांच्या वतीने  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठजी गोगावले  यांनी  आयुक्त , नरेगा विभाग, नागपूर,  जिल्हाधिकारी बीड,  मुख्य कार्यकारी अधिकारी  जि.प. बीड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), बीड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प. सत्वर कार्यवाहीसाठी आदेशीत केले आहे. तसेच गटविकास अधिकारी राठोड  यांनी लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे. कामांच्या पुनर्मंजुरीसाठी (दुबार वर्क कोड) मूळ संचिका व चालू तारखेचा 7/12 उतारा घेऊन तातडीने पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व गावांना वर्क कोड डिलीट होण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून पुनर्मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मस्टर तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

कृष्णा आंधळेचा शोध लागेना; अहवाल सादर करण्याच्या न्यायालयाच्या सूचना

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्‍चितीवर 12 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे. गुरुवार दि. 27 नोव्हेंबर रोजी विशेष मकोका न्यायालयात संशयित विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. घटनेतील फरारी कृष्णा आंधळे सापडत नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील तपास यंत्रणांना विशेष मकोका न्यायालयाने दिल्या.

संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबरला अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशेष तपास पथकाने वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यावर अपहरण, खंडणी आणि हत्येचा ठपका ठेवला. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. मात्र, घटनेला वर्ष लोटत आले तरी यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.गुरुवारी झालेल्या सुनावणीत विशेष सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विष्णू चाटे याचा या प्रकरणात कसा सहभाग आहे, याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यावेळी या प्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधत तपास यंत्रणांकडे याबाबतची विचारणा करून तो का सापडत नाही, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या. तसेच पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होणार असून, या दिवशी आरोप निश्‍चिती करून सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; आ.सुरेश धस अडचणीत

0

बीड — शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री 10 ते 15 जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर – बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला  झाला आहे.या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती आणखी गंभीर झाल्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.मात्र हल्ला कुणी केला कारण काय या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान या प्रकरणात आ. सुरेश धस यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. यापूर्वी आ. धस यांचा जमीन देवस्थान घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाल्याचा देखील सांगितलं जात आहे.

राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली आणि नंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला.

यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते.दरम्यान, हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. खाडे यांच्या तक्रारीनंतर बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

पीएसआय चा कारनामा; सराफा व्यापाऱ्याला लुटले!

0

बीड — जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले असताना पोलिस ही गुन्हेगारीत बरबटले असल्याचे समोर येत आहे. यामुळे पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.बीडमध्ये लॉजवर थांबलेल्या एका सराफा व्यावसायिकाला चक्क पोलीस अधिकाऱ्याने आणि इतर पोलिसांनी लुटले असल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे कामासाठी बीड येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने ते शहातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी अचानक शहरातील शिवाजीनगर येथील पोलीस उप निरिक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले. त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि मोबाईल पोलिसांनी जप्त करून सर्व प्रकारचा संपर्क बंद केला.त्यानंतर त्यांच्यावर सतत दबाव टाकत 7 लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र जैन यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने त्यांनी नकार दिल्यावर पोलिसांनी कथितपणे “मेडिकल खर्च” सांगत दुसऱ्या एका स्थानिक व्यापाऱ्याकडून 4 लाख रुपये मागवण्यास भाग पाडले.ही रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष घेतल्याचे सांगितले जाते. इतक्यावरच न थांबता, जैन यांना रात्री उशिरा दुसऱ्या एका लॉजवर नेऊन संपूर्ण रात्र डांबून ठेवण्यात आले. पहाटेच्या सुमारास आरोपींनी उर्वरित 3 लाख रुपये सकाळी 12 वाजेपर्यंत आणण्याचे आदेश देत त्यांना सोडून दिले.या घटनेनंतर जैन यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत चौकशी सुरु करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.