Home Blog Page 100

दोन कारची समोरासमोर धडक तीन ठार एक गंभीर जखमी

0

केज –अंबाजोगाई – केज महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास चंदन सावरगाव जवळ घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार क्र.एम – 23ई–6852 आणि कार क्र. एम एच -12 एम डब्ल्यू- 35 63 या दोन कारची चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले. या रस्ता अपघातात अमित दिलीपराव कोमटवार वय 35 वर्ष रा. दिंद्रुड ता. माजलगाव तसेच बीड येथील आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. आणखी एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला असून जखमीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेंडगे हे कॉ. पठाण, वारे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले.मृतातील अमित कोमटवार हे दिंद्रुड चे सरपंच अजय कोमटवार यांचे ज्येष्ठ बंधू असल्याची माहिती मिळत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण :सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. आज शुक्रवारी दि. 31रोजी त्याची कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.न्यायालयाने

सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले गुजरातला पळून गेला होता. त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तो एका साथीदारा सोबत पुण्यात पैसे घेण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर सुदर्शन घुलेचा तपास सीआयडी, एसआयटी आणि बीड गुन्हे शाखेने केला आहे.
सुदर्शन घुलेला यापूर्वी पाच दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली होती. त्याची कोठडी आज संपली आणि त्याला बीड येथील मोक्का न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तथापि, या प्रकरणात केव्हा तरी पोलीस तपास यंत्रणेला कोठडी घेण्याचा अधिकार असणार आहे.दरम्यान
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि सुधीर सांगळे वाल्मीक कराड यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे.

वाळू माफीयांना मदत करणारा सहाय्यक फौजदार व हवालदार निलंबित

0

बीड — अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणात आरोपींसोबत साटे लोटे करणाऱ्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश दिले होते. पण तरीही वाळूसह वाहन ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यासही विलंब केला. या गोष्टी गुन्हेगारांना मदत करण्यासारखी आहे. यावर आता पोलीस अधिक्षक नवनीत कांवत यांनी सहाय्यक फौजदारासह हवालदारावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

आ.संदीप क्षीरसागरांकडून डीपीडीसी बैठकीत केले महत्वाचे लोकप्रश्न उपस्थित

0

मतदारसंघातील विविध कामांसाठी केली विशेष अतिरिक्त निधीची मागणी

बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी (दि.३०) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील लोकांच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले लोकप्रश्न मांडले. तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष अतिरिक्त निधीची मागणीही आ.क्षीरसागर यांनी यावेळी केली.


गुरुवारी (दि.३०) रोजी बीड जिल्हा नियोजन समितीची, पहिली बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न मांडले.

आ.संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या

– बीडच्या पंचायत समिती आवारामध्ये स्व.आण्णासाहेब पाटील व स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचा पुतळा बसविणे.
– ३० खाटाचे आयुष रूग्णालय NRHMअंतर्गत २०१९ ला बीडसाठी मंजुर आहे. त्यासाठी शासकीय जमीन बीड शहरातील इमामपुर रोडवरील गट नं.३४-३५ व पारगाव जप्ती या शिवारात उपलब्ध आहे.यासाठी कार्यवाही व्हावी.
– नगर परिषदेकडे महावितरणची ३६ कोटी जास्त रूपयांची थकबाकी आहे. त्या संदर्भात जनहित याचिका देखील दाखल आहे. नगरपरिषदेच्या सोलार प्रकल्पाची विद्युत निर्मिती होते ती विद्युत विभागाला द्यायची आणि त्यांच्याकडून आपणास हवा असणारा विद्युत पुरवठा घ्यायचा. तसेच ३६ कोटी रुपये थकबाकी भरण्यास मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी तत्वतः मंजूरी दिली आहे. त्याबाबत मा.दादांचे आभार व्यक्त केले.
– बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतःळ्याची उंची वाढवणे याबाबतीत तात्काळ पुढील कार्यवाही बाबत संबंधितास आदेशीत व्हावे.
– अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृह मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून बीड शहरात उपलब्ध असलेल्या शासकीय आवारामध्ये सहन जागा उपलब्ध करून देणे.
– जिल्हा नियोजन अंतर्गत बीड नगर परिषदेला नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध व्हावा.
– बीड नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नं.७४५४ मधील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दु घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण व तसेच सुभाष रोड येथील जनावरांचा दवाखानाची जागा नगर परिषद, बीडला हस्तांतरण करणेेसाठी बैठकीचे आयोजन बाबत संबंधितास आदेश व्हावे असे झाल्या नगर परिषद, बीडच्या स्वउत्पन्नामध्ये वाढ होईल.
– बीड येथील जनावरांचा दवाखाना, सुभाष रोड येथील जागा नगर परिषद, बीड ला हस्तांतरण करणेसाठी बैठकीचे आयोजन करणे.
– बीड नगर परिषद हद्दीतील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दू घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण करणेबाबत
– सन २०२० चा रखडलेला पीक विमा राज्य तक्रार समितीने डिसेंबर २०२२ मध्ये बीड,वडवणी,गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे सांगितले होते. मात्र एक वर्ष उलटले तरी अद्याप तरी अंमलबजावणी झाली नाही.
– महाडीबीटी अंतर्गत लाभार्थी असलेल्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही. या बाबत विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.
– श्री क्षेत्र कपिलधार 100 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर असून त्यास मान्यता देण्यात यावी.
– शिवणी ता.बीड येथील महाविहार धम्मभुमी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण केंद्रास ‘क’ दर्जा तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात यावा.
– श्री क्षेत्र उजव्या सोंडीचा गणपती मंदिर देवस्थान मन्यारवाडी, श्री क्षेत्र बेलखंडेश्वर महादेव संस्थान बेलखंडी पाटोदा ता.जि.बीड या तिर्थक्षेत्रास ‘क’ दर्जा प्राप्त करण्यात यावा.
– खंडेश्वरी मंदिरासमोरील तालुका क्रीडा संकुलासाठी आपल्या विभागाकडून ५ कोटी रूपयांच्या विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापैकी १ कोटी रूपयांच्या निधी प्राप्त असून उर्वरित ४ कोटी रूपयांच्या विकास कामांचा आराखडा सादर केलेला असून त्या निधी उपलब्ध होणे बाबत.
– बीड जिल्हा संकुलाची निर्मिती व सर्व क्रीडा सुविधांचे काम २५ वर्षापुर्वी झालेले आहे. सदर क्रीडा संकुलासाठी ८ कोटी रूपयांची तरतुद झालेली आहे. संकुलाची इमारत दुरूस्तीचे व क्रीडा सुविधांच्या दुरूस्तीचे काम करणे गरजेचे असून नवीन क्रीडा संकुलाच्या निर्मितीप्रमाणे संकुल व क्रीडा सुविधांच्या दुरूस्तीसाठी विशेष बाब अंतर्गत १७ कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी.
– बोरफडी, मौज, जेबापिंप्री दगडी शहाजानपुर, मन्यारवाडी, मांजरसुंबा ता.बीड येथील उपकेंद्र इमारत बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
– बीड शहरातील अंकुशनगर उपकेंद्रावरून अर्ध्यापेक्षा जास्त बीड शहराला वीज पुरवठा आहे. सर्व सरकारी कार्यालय व वाढीव वस्त्या सदर उपकेंद्रावर असून ओव्हरलोड होत असून नवीन अतिरिक्त उपकेंद्र पोलीस कॉलनी येथे झाल्यास सोयीस्कर होईल व लाईटची अडचण मार्गी लागेल.
– बीड जिल्हा वसुलीमध्ये एक नंबर असून शहरातील दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध व्हावा.
– डीपीडीसीमध्ये बीड तालुक्यातील एकही प्रस्ताव मंजुर झालेला नाही.
– ⁠गावठाण अंतर्गत वस्ती येथील डी.पी.देणे बाबत नियम व अटी शिथील करण्यात यावे.
– बीड शहर अंतर्गत जुने पोल बदलणे व केबलद्वारे काम करणेसाठी आदेशीत व्हावे.
– पाली येथील 33 के.व्ही.चे काम सुरू करणे बाबत आदेशीत व्हावे.
– निवारणबीड व शिरूर का.तालुक्यातील कृषी व सिंगल फेज डी.पी.देण्यात यावे.
– ताडसोन्ना, लिंबारुई, चर्‍हाटा, आहेरधानोर, बोरखेड, मोरगाव ता.बीड येथे वीजवितरण उपकेंद्र करण्यासाठी मंजुरीसह देण्यात यावा.
– बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा खोली बांधकाम, दुरूस्ती आणि कंपाऊंड वॉल बांधकाम करणे.
– बीड १ व २ ,बीड नागरी,शिरूर कासार येथील प्रकल्पातील व प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील रिक्तपदे भरणे.
– युवा शांतीवन पाली येथील उर्वरित कामे करणेसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा.
– देवराई येथील आराखडा तयार करून कामे करणेसाठी निधी उपलब्ध होणे बाबत.
– शिरूर तालुक्यातील हिवरसिंगा, जवळागिरी, बरगवाडी या गावातील वाहतुकीसाठी रेल्वे ब्रिज नसल्यामुळे गावात नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याबाबत रेल्वे विभागाकडे प्रस्ताव सादर करून या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी विनंती केली.

अंजली दमानिया नामदेव महाराज शास्त्रींना भेटून मुंडें विरोधात पुरावे देणार !

0

 बीड — भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भगवानगडावर जाऊन महंत नामदेव शास्त्री महाराज यांना मुंडे विरोधात पुरावे देणार असल्याचं एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितलं.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी आरोपांच्या फैरी झडत असून अजित पवार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.
सर्व बाजूंनी खिंडीत सापडलेले धनंजय मुंडे हे नुकतेच भगवानगडाला शरण गेले. DPDC ची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहचले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा इशारा दिला. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी. मी धनंजय मुंडेविरोधातील कागदपत्रं महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार ‘ असं अंजली दमानिया म्हणाल्या. नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानंतर दमानिया यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं आहे.या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी
पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. याच मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती. आता नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यानंतर टीव्ही9 शी बोलत अंजली दमानियांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

भगवानगड हे आपल्या सर्वांसाठीच एक पवित्र स्थान आहे. आणि अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं ,एखाद्या राजकारण्याची पाठराखण केली जावी, ते पाहून मला वाईट वाटलं. आपण कोणीही किंव धनंजय मुंडे असोत, मंदिरात किंवा पवित्र स्थानी जाताना, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. त्यामुळे नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असेल, पण त्यांची (धनंजय मुंडे) जी दुसरी बाजू आहे ती नामदेव शास्त्रींना कदाचित माहीत नसावी, म्हणूनच त्यांनी असं विधान केलं असावं असं मला वाटतंय, असं दमानिया म्हणाल्या.

मला त्यांना अतिशय आदरपूर्वक सांगायचं आहे, की तुम्हाला जर याची माहिती नसेल तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. ती सगळी कागदपत्र तुमच्या पर्यंत पोहोचवेन. मुंडेंविरोधात बोलणारे जे लोक आहेत ते कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीयेत. जी खरी वस्तुस्थिती आहे, तीच दाखवली गेली आहे. परळीत जी दहशत आहे तीच दाखवली गेली आहे. मी जे धनंजय मुंडे विरोधात बोलले ते सुद्धा त्यातलं तथ्य जे आहे, तेच आम्ही सांगितलं आहे. कोणीही त्यामध्ये स्वत:ची मीठ , मिरची लावून बोलत नाहीये. राजकारण हे वेगळं असतं, तिथे अशा शूचिर्भूत ठिकाणाहून हे झालं, ते पाहून मला दु:ख झालं, असं दमानिया म्हणाल्या.

नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भगवान गडावरून त्यांनी सध्याच्या राजकीय चिखलफेकीवर, सामजिक ध्रुवीकरण, समाजातील तेढ यावर भाष्य केले. त्यांनी धनंजय मुंडे यांना सर्वच प्रकरणात क्लीनचिट दिली. इतकेच नाही तर भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा थेट संदेश दिला. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने सांप्रदायाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे,असे ते म्हणाले.

भगवानगड धनंजय मुंडें च्या पाठीशी — महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेते राजीनामा मागत आहेत. ही मागणी जोर धरत असतानाच धनंजय मुंडे खंडणीवर जगणारे नेते नाहीत. दोष नसताना ते मीडिया ट्रायल ला बळी पडत आहेत. त्यामुळे “भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे”अस महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबरोबर काय चर्चा झाली?या विषयाची माहिती डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. तसेच त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट करत भगवानगड मंत्री धनंजय मुंडे च्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं सांगितलं.

डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या सांप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असे स्पष्ट मत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत. तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरु आहे”, असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.
मला माध्यमांना असं विचारावसं वाटतं की ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. मात्र, त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. आज ज्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे ते नेते खंडणीवर जगणारे नाहीत. गेले जवळपास 53 दिवस झाले आहेत मीडिया ट्रायल चालवले जात आहेत. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही. मात्र, त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांची पार्श्वभूमी तशी नाही”, अशी भूमिका नामदेव महाराज शास्त्री यांनी घेतली आहे. त्यामुळे बीडमधील राजकीय परिस्थिती धनंजय मुंडे यांच्याविरोधात असले तरी देखील भगवानबाबा गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे.

देवेंद्र फडणवीसांनी बेईमानी केल्याचा आरोप, मनोज जरांगे पाटील उपोषण स्थगित करणार!

0

जालना — आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आली. जरांगे पाटील यांनी

उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं आहे, मराठा समाजाचं डोळे उघडले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली.
तसेच यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यासंबंधित पुढील निर्णय घेण्यात येईल असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली. तरीही शासन स्तरावरून या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून आलं. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढे दिवस आंदोलन करावं लागेल असं वाटलं नव्हतं असं मनोज जरांगे म्हणाले.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलं असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होतं. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटू नये
यासाठी उपोषण मागे घेत असल्याचं जरागे यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे म्हणाले की, “खरं आहे ते टिकत नाही, जे हक्काचं आहे तेच देत नाहीत. फडणवीस मराठा आरक्षणावर होय पण म्हणत नाहीत आणि नाहीपण म्हणत नाहीत. ते गप्प बसलेत त्यांच्या मनातली सूड भावना समोर आली आहे.
आमच्यासोबत बेइमानी केली तर पाच वर्षे सरकार नीट चालू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार की नाही हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. पण आता आंदोलन थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

धनंजय मुंडे पुढे नवे संकट; ईडी चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका!

0

मुंबई — संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या हितसंबंधावरून राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच उच्च न्यायालयात आणखी एक याचिका धनंजय मुंडे विरोधात दाखल करण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले असून मुंडे यांच्या मालकीच्या अनेक शेल कंपन्या आहेत. खंडणीची रक्कम त्यांनी वळती केल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा थेट तपास उच्च न्यायाल्याच्या देखरेखेखाली करावा. त्यासोबतच याचा तपास समांतर ईडीने देखील करावा, यासाठी या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
शेल कंपन्यात गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम कुठून आली, याचा तपास करण्यात यावा, या प्रकरणी मनी लाँडरिंग झाला असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला आहे. परळी येथील व्यंकटेश्वरा सेल्स इंडस्ट्रियल प्रा. लि. मध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे व वाल्मिक कराड व अन्य काही व्यक्ती संचालक आहेत. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा आणि सक्तवसुली संचालनालयानेही समांतर तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. योग्य तपास झाल्यास मंत्र्यावर मकोका अंतर्गत कारवाई होऊ शकते, असेही याचिकेत म्हटले आहे.
या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेत बीडच्या पोलीस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच निवडणूक आयोगाला ही याचिका आणि धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगापुढे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मीक कराडचे बेकायदा धंदे सुरू असतात. तेथूनच त्याने आवादा या पवनऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली. या कंपनीचे संचालक धनंजय मुंडें आहेत. जगमित्र साखर कारखान्याचेही संचालक वाल्मीक कराड, धनंजय मुंडे व अन्य काही जण असून, या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
याबरोबरच दुसरीकडे उच्च न्यायालयात काही दिवसापूर्वीच धनंजय मुंडे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मांचा दावा आहे की, त्यांचे धनंजय यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे. त्यांनी याचिका दाखल करुन गंभीर आरोप मंत्री मुंडेंवर केले आहेत.
करुणा शर्मा यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी परळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज 30 ऑक्टोबर 2024 रोजी फेटाळला होता. मात्र, धनंजय मुंडे आणि इतरांचे अर्ज मंजूर केले होते. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 23 नोव्हेंबर 2024 रोजीच्या मतमोजणीनंतर घोषित केले होते.त्यानंतर करुणा शर्मा यांनी 4 जानेवारी 2024 रोजी खंडपीठात निवडणूक याचिका सादर केली आहे. आपण स्वतः 1996 मध्ये धनंजय मुंडे यांच्याशी कायदेशीर लग्न केले होते. अधिकृत पत्नी असताना धनंजय मुंडे यांनी दोन अपत्यांचा उल्लेख केला. मात्र, पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती दडवली, असल्याचे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे.धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करीत मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून राज्य सरकारवरील दबाव वाढवला जात आहे. संपूर्ण राज्यभर मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणाचा मोर्चे काढून निषेध केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून महिलेला लूटले;आरोपी पकडला

0

बीड — नकली सोन्याची दोन बिस्किट रस्त्यावर टाकून वयस्कर महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याची घटना अंबाजोगाईत घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीला अटक करून कानातील झुंबर हस्तगत करण्यात यश मिळवले.

अंबाजोगाईच्या बस स्थानकात वयस्कर महिलेस समोर सोन्याची नकली बिस्किट एका चोरट्याने रस्त्यावर टाकली. त्यानंतर तिथे दुसरा आरोपी आला त्याने स्वतः जवळची डुप्लिकेट अंगठी पहिल्याला दिली तसेच त्याच्याकडून सोन्याचे बिस्किट घेतले त्याच वेळी महिलेला सोन्याचे बिस्किट देतो असे आमिष दाखवून तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले त्या बदल्यात सोन्याचे बिस्किट दिले मात्र हे बिस्किट बनावट असल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने पोह महेश जोगदंड, जफर पठाण यांना महिलेचे दागिने लुटणारा आरोपी आडस फाटा येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला जेरबंद केले. सतीश शिवाजी जाधव वय 34 वर्ष रा. भातखेडा तालुका जिल्हा लातूर याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मित्र बालाजी गायकवाड यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे झुंबर जप्त केले असून आरोपी बालाजी गायकवाड हा अद्याप फरार आहे.

पदोन्नती करूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे –आ.संदीप क्षीरसागर 

0

 शिक्षक संघटनांकडून आमरण उपोषणाचा इशारा

बीड — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सन २०२३-२४ च्या संच मान्यतेच्या आधारे अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु पदोन्नती न करताच शिक्षकांचे समायोजन करणे हे शिक्षक बंधू-भगिनींवर अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे अगोदर पदोन्नतीची प्रक्रिया राबवून नंतरच समायोजन करावे अशी विनंती आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान पदोन्नती न करताच समायोजन केल्यास गुरूवार (दि.३०) रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.
दि.२८ जानेवारी २०२५ रोजी बीड जिल्हा परिषदेकडून शिक्षकांच्या समायोजनाबाबत आदेश काढण्यात आला असून दि.३१ जानेवारी २०२५ रोजी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु सदरील समायोजन प्रक्रिया ही पदोन्नती प्रक्रिया न करताच करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्यायकारक ठरणार आहे. सन २०२३-२४ च्या संचमान्यतेच्या आधारे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार आहे. परंतु मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षकांची पदोन्नती अगोदर केल्यास सहशिक्षकांची पदे रिक्त होतील जेणेकरून अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी जागा उपलब्ध होतील आण त्यांच्यावर समायोजनाबात कुठलाही अन्याय होणार नाही. परंतु शिक्षण विभागाकडून घाई घाईने पदोन्नती न करताच समायोजन करण्याचा घाट घातल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्याय होईल. त्यामुळे दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी होणारी समायोजन प्रक्रिया स्थगित करून अगोदर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.