बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील फेटाळण्यात आला त्यामुळे त्याचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग धूसर झाला आहे.
आरोपी वाल्मीक कराड याने बीड जिल्हा न्यायालयात दोष मुक्तीचा अर्ज दाखल केला होता मात्र गुन्ह्याची गंभीरता व समोर आलेल्या पुराव्या वरून हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील अपयश आले. बीड न्यायालयाचा निर्णय खंडपीठाने देखील कायम ठेवला. त्यानंतर वाल्मीक कराडने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर आज झाली. सर्वोच्च न्यायालयात देखील वाल्मीक कराडला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सध्या तरी वाल्मीकचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग धूसर झाला आहे. दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील त्याचे नाव समोर आले असून आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणात अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.




