बीड– ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आरोपी विजय पवार, हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी केला होता.
मुंडे यांनी थेट संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत, विजय पवार याच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या रात्री तो क्षीरसागरां सोबत असल्याचे म्हटले होते. तसेच, पीडितेच्या वडिलांना दोन दिवसांत 20 फोन केल्याचा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला होता. आता या आरोपांवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संदीप क्षीरसागर यांनी आज धनंजय मुंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले की, मुंडे यांची मागणी एसआयटी चौकशीची आहे आणि त्याला पूर्ण संमती आहे. “जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच आरोपी शिक्षकांना अटक झाली आहे,” असे क्षीरसागर म्हणाले. प्रशासनासोबत चर्चा सुरू असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले. “माझ्या जवळचे असले तरी कारवाई करायला मागे-पुढे बघू नका, असे मी स्वतः पोलिसांना सांगितले आहे,” असेही त्यांनी नमूद केले. पीडितेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल झाला. दहा दिवस लागले नाही. असं सांगत त्यांनी हे प्रकरण तातडीने हाताळले गेल्याचे सांगितले.
यावेळी संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. “मी काही त्यांच्यासारखं 150 दिवस पळून गेलो नाही,” असे ते म्हणाले. त्यांचे मंत्रीपद गेल्याने त्यांना दुःख झाले असून, त्यामुळेच ते या प्रकरणात बोलत असल्याचा आरोपही क्षीरसागरांनी केला. “या प्रकरणात ते जसे बोलत आहेत, तसेच त्यांनी ‘मस्साजोग’ प्रकरणीही आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती,” असा पलटवार त्यांनी केला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असेही क्षीरसागर म्हणाले.
संदीप क्षीरसागर यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात पोलीस देखील तत्परतेने कारवाई करत आहेत. “मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे आहेत, त्यांनी जोर लावला पाहिजे,” असे ते म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना 150 दिवस बाहेर राहावे लागले, त्यांचे मंत्रीपद गेले, त्यामुळेच त्यांना दुःख आहे असेही क्षीरसागर यांनी पुन्हा अधोरेखित केले. “लोकप्रतिनिधी म्हणून मी रोज रस्त्यावर काम करतो. चहाच्या टपरीवरही मी जातो, तिथे लोक भेटतात. संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीडितेकडे मी जाणार होतो, पण सध्या जाणं योग्य नाही म्हणून गेलो नाही,” असही त्यांनी स्पष्ट केलं.

