आष्टी — खेळत खेळत शेत तलावाजवळ गेलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना टाकळसिंग येथे शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता घडली. श्रावण रोहिदास चव्हाण (वय ८) व श्रावणी रोहिदास चव्हाण (वय १०) (मूळ रा.कुसवडगाव, ता. जामखेड, जि. नगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत.
जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील मजूर रोहिदास चव्हाण (वय ३५) हे सध्या मजुरी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कुटुंबासह आलेले असून, याच ठिकाणी राहात आहेत. त्यांचा मुलगा श्रावण रोहिदास चव्हाण व मुलगी श्रावणी रोहिदास चव्हाण हे दोघे बहीण-भाऊ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता खेळत खेळत शेतकरी शिवाजी दौंडे यांच्या शेतात गेले. यावेळी शेत तलावात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हिंगे हे करत आहेत.

