बीड — मुस्लिम मतांमध्ये फूट, ब्राह्मण मारवाडी दावणीलाच बांधलेला, ओबीसी तर आपलाच, मराठा समाज दोन्ही राष्ट्रवादीत विभक्त होणार गल्ली ते दिल्ली आपलीच सत्ता, बीडची जनता निव्वळ दूधखुळीच, उगाच 35 वर्ष सत्ता आपल्याला दिली नाही. या अशाच गृहीतकाच्या “पप्पू” राजकारणामुळे विधानसभेत जनतेने फटका देऊनही पुन्हा नगरपालिका आपलीच असं म्हणत “राष्ट्रीय पक्षाच धरलं बोट तिथेच दिसली नियतीतली खोट” असं म्हणताना जनतेने देखील योगेश क्षीरसागर कडे पाठ फिरवत आहे.
धर्मनिरपेक्षतेची कौटुंबिक परंपरा चालवणारे योगेश क्षीरसागर अचानक धार्मिक राजकारण करणाऱ्या पक्षात जाऊन भविष्यात पक्ष धोरणानुसार गरळ ओकणार नाहीत याची शाश्वती कोणीच देणार नाही. शेवटी स्वार्थाच राजकारण महत्त्वाचं बीडची जनता दुधखूळीच ती आपल्या मागे येणारच उगाच 35 वर्ष जनतेने नगरपालिकेचे सत्ता दिली नव्हती. ती आताही देणारच याचा ठाम विश्वास बीडकरांचा बळी गेला तर गेला. आपण भले आपलं स्वार्थी राजकारण भले एवढाच फंडा योगेश क्षीरसागरांनी वापरला. स्वार्थासाठी एका क्षणात धर्मांध पक्षाचं बोट धरताना गणित ही विजय मिळणारच अशी मांडली. बीडच्या राजकारणात एमआयएमच्या प्रवेशाने मुस्लिम मतं एम आय एम कडेच जाणार , ब्राह्मण मारवाडी तर भाजपच्या दावणीला बांधलेला आपल्याही तो हक्काचाच! ओबीसी मतं देखील आपलीच मराठा समाजाची मतं दोन्ही राष्ट्रवादीत विभक्त होणार तोडा फोडा राज्य करा या नीतीचा फायदा आपल्याला नक्कीच होणार? बीडच्या जनतेला कळतचं काय? आपण नगरपालिकेचे राजकुमार जनता आपल्यालाच कौल देणार! जनता लोकशाहीत नाही तर आपल्याच राजेशाहीची मांडलिक आहे.असं मांडलेलं गृहीतक बीडच्या जनतेला मात्र रुचलं नाही. ब्राह्मण आपलेच ते कुठेच जाणार नाहीत असं ग्राह्य धरून त्यांना रामराम घालायची देखील गरज नाही. असं म्हणत योगेश क्षीरसागरांची प्रचाराची मोहीम अगदी जोरात सुरू आहे.तीच स्थिती मारवाडी समाजाची देखील आहे. भाजपचा मूळचा कार्यकर्ता तर सतरंज्या उचलायला जन्माला आला आहे. त्यामुळे मिळत असलेली हीन भावना असंतोषाला कारणीभूत ठरत आहे.
मुस्लिम परिसरात सभा घेतली की ते आपोआपच एम आय एम कडे जाणार यासारखी गणित मांडून बुद्धिबळाचा “पप्पू” पट योगेश क्षीरसागरांनी खेळायला सुरुवात केली आहे.
बीडची जनता देखील “वस्ताद” आहे. डोक्यावर घेण्याची जनतेची ताकत आहे तर पायाखाली घेण्याची देखील तयारी ठेवली जाते. हा कौटुंबिक इतिहास गृहीतकाच्या राजकारणात योगेश क्षीरसागर पार विसरले. त्यांचेच काका जयदत्त क्षीरसागर या इतिहासाचे ज्वलंत साक्षीदार आहेत. त्यांना मानणारा वर्ग मोठा असला तरी धर्मांध पक्षाला जयदत्त क्षीरसागर देत असलेली साथ त्यांच्या सहकार्यांना देखील पटलेली नाही. जन्मभर भाजपच्या नावाने खडे फोडले आता कुठल्या तोंडाने भाजपला मत मागायची असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला आहे. तो सहाजिकच आहे.
जनतेने दिलेल्या फटक्यामुळे राजकारणाचा सूर आजही त्यांना गवसण अवघड चालल आहे. हे मात्र लक्षात घेतलं गेलं नाही. विधानसभेत बीडच्या जनतेने योगेश क्षीरसागर यांना याची चुणूक दाखविली. मात्र नगरपालिका आपली जहागिरी आहे ती आपल्याच ताब्यात जनता देणार हा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशानंतर आलेली उत्साहाची लाट ओसरली आहे. जनतेमध्ये नाराजीचा उमटत असलेला सूर बडवायला लावणार आहे उर असं म्हणण्याची वेळ आली आहे.

