बीड — गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही दैनिके व युट्यूब चॅनेलवर “सह्याद्री–देवराई येथे भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णतः चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्यक्षात सह्याद्री–देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे २० गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे, झाडांचे नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती आहे.
देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व वृक्षप्रेमी श्रीकृष्ण उबाळे यांनी सह्याद्री–देवराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आग आटोक्यात आणणाऱ्या वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये शेख अकबर, जयराम काळे, वनरक्षक अशोक केदार, विजय केदार, पद्माकर मस्के, अर्जुन साळुंखे, मधुकर नैराळे व विलास नवले यांचा समावेश होता.

