केज — तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल योजनेत एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. येथील ९ स्थानिक लाभार्थ्यांच्या हक्काची घरकुलाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न होता, चक्क बिहार आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या प्रकरणी दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोनाली अमोल जाधव आणि प्रा. सतीश मोराळे यांनी केली आहे.

शनिवारी (दि. २८) झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सन २०२४ मध्ये मंजूर झालेल्या यादीतील ९ लाभार्थी हे परराज्यातील असून त्यांची नावे ना स्थानिक मतदार यादीत आहेत, ना ते येथील रहिवासी आहेत. तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.बीड तालुक्यातील धावज्याची वाडी येथील याबरोबरच “काटकर”आडनावाच्या माय लेकरांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. दोघेही नांदुर घाट चे रहिवासी नाहीत.
युपी बिहार मधील संतोष कृष्णा कुमार, पिंटू दुधनाथ बिन, रंजन देवनारायण कुमार, राहुल कुमार मनजी , मानोन कुमार, पप्पू मुंशी मीयान, मोहम्मद इर्शाद अन्सारी, कुंदन छंदादीप कुमार यांच्या नावावर प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपये देण्यात आले
स्थानिक गरिबांची फसवणूक करून शासनाचा निधी लाटणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली आहे.
या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भगवान शिरसाट यांनी सांगितले की, आम्ही स्थानिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांसह रीतसर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले होते. मात्र, तरीही ९ जणांचे हप्ते परराज्यातील लोकांच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चूक नेमकी कुठे झाली आणि किती रक्कम वर्ग झाली, याची यादी आम्ही पंचायत समितीकडे मागितली आहे. गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. रीतसर तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड येथील तांत्रिक विभागाच्या ‘टेक्निकल एक्सपर्ट’ मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.




