आष्टी — खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली. धडक बसताच कारने पेट घेतला. आग एवढी भयानक होती की, गाडीत असलेल्या दोघांना गाडीबाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत माय लेकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडे दहाच्या वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर घडली.
अपघातातील मयतात ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी यांचा समावेश आहे.
शुक्रवार दि. 27 मार्च रोजी सकाळी आष्टी तालुक्यातील बीड — अहिल्यानगर महामार्गावर कापशी गावाजवळ भीषण दुर्घटना घडली. ऋषिकेश श्रीहरी पुरी व पुष्पा श्रीहरी पुरी हे माय- लेक दोघेजण कार मधून बीडच्या दिशेने निघाले होते. याचवेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवा क्र.16सी.डी 7305 ने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला. कारने पेट घेतल्याने आत असलेल्या आई आणी मुलाला गाडीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत माय लेकरांचा जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. वडील ह भ प श्रीहरी महाराज पुरी कीर्तनात असतानाच काळाने घाला घातला. श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




