गेवराई — वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बसवलेल्या झटका मशीनचा शॉक लागून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मानमोडी येथे घडली.
सुधाकर रावसाहेब जाधव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.मानमोडी येथील रहिवासी असलेले सुधाकर जाधव यांच्या मालकीची शेतजमीन गावालगत आहे. सध्या त्यांच्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा व भुईमूग ही पिके उभी आहेत. वन्य प्राण्यांपासून विशेषतः रानडुक्कर व हरीण – पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेतात झटका मशीन बसवले होते.रविवारी सकाळी जाधव हे शेतात गेले असता तोल जाऊन झटका मशीनला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, दुपारी चार वाजता गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातू व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे मानमोडी परिसरात शोककळा पसरली असून शेतकऱ्यांनी अशा विद्युत यंत्रणांचा वापर करताना योग्य सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.




