नवी दिल्ली — देशभारतील कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी बंद पाळण्यात येणार आहे.
उद्याच्या संपात ३० कोटींहून अधिक कामगार सहभागी होऊ शकतात असा कामगार संघटना नेत्यांचा दावा आहे. परिणामी, उद्या अनेक राज्यांमध्ये बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालये आणि औद्योगिक कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर उद्या कोणकोणत्या सेवा या बंद राहतील आणि कोणत्या सुविधांना मुभा देण्यात आली आहे ते आपण जाणून घेऊया.
उद्याची भारत बंदची हाक हि नवीन लेबर कोड आणि भारत-अमेरिकेतली व्यापारी कराराविरोधात आहे. या नवीन बदलांमुळे देशाच्या कामगार वर्ग, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या नवीन धोरणांचा या संघटनांनी विरोध केला आहे. भारत बंदमध्ये 10 केंद्रीय ट्रेड युनियनचा समावेश आहे. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. कामगार संघटनांचे म्हणणे आहे की हे कायदे कंपन्यांना अधिक फायदे देत असून कामगार संरक्षण कमी करतील. शेतकरी संघटनांनीही या चळवळीला पाठिंबा दर्शविला आहे.
उद्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही भागात बंद राहू शकतात किंवा मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम करू शकतात.
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये उपस्थिती कमी असू शकते.
बस, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा कमी वेगाने चालू शकतात किंवा काही भागात बंद राहतील.
कारखाने आणि औद्योगिक युनिट्स एका दिवसासाठी कामकाज थांबवू शकतात.
ज्या भागात संप सर्वात प्रभावी आहे तेथे शाळा आणि महाविद्यालये बंद राहू शकतात.
अनेक शहरांमध्ये बाजारपेठा आणि स्थानिक दुकाने देखील बंद राहू शकतात.
उद्या, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंद असला तरी काही जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील. रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय मेडिकल, एटीएम, अग्निशमन दल आणि मदत सेवा, दूध पुरवठा, वर्तमानपत्र वितरण, विमानसेवा सुरूच राहणार आहेत .

