“स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कृषी व सहकार क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे — डॉ.दादाराव गरबडे”

चौसाळा — चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. १२ मार्च हा त्यांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. महाविद्यालयात या निमित्त डॉ.दादाराव गरबडे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे कृषी व सहकार विषयक विचार विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.चंद्रसेन आवारे उपस्थित होते.
यावेळी अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ.दादाराव गरबडे यांनी आपल्या भाषणात संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला कृषी क्षेत्रात सिंचनाच्या योजना राबवून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले. धरण,तलाव सारखे प्रकल्प सक्षमपणे वाढवून हरित क्रांती घडवून आणली. शेती मालाला हमी भाव व बाजार पेठ उपलब्ध करून खरेदी विक्री व्यवहार सुलभ झाल्यामुळे शेती मालाला चांगली किमंत आल्यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले तसेच त्यांना कर्ज पुरवठा व्हावा म्हणून सहकारी सोसायटी काढल्या. ज्या मुळे शेतकऱ्यामध्ये आर्थिक क्रांती झाली. महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होण्यास मदत झाली. आज खऱ्या अर्थाने यशवंतरावांच्या विचाराची गरज असल्याचेही मत त्यांनी मांडले. या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.गणपती धावळशंख,अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.चांगदेव शेळके,डॉ.हिरवे,डॉ.वनवे उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागाच्या वतीने स्वर्गीय.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.शेळके यांनी केले.शेवटी आभार प्रा.डॉ.हिरवे पी.एस. यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.