“जनशक्तीची “ताकत दाखव मतदार राजा..! नाहीतर पाच वर्ष वाजत राहील नुसताच बाजाऽऽ!

चौसाळा — “शिट्टी” चा आवाज आला की माणूस सतर्क होतो. हीच सतर्कता मतदान करताना सुद्धा आवश्यक आहे. मतदार राजा निवडणुकीत “धनशक्ती“च्या मोहाला बळी पडला तर पाच वर्ष नुसता बाजाच वाजवत बसायची वेळ नक्कीच येते हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे अतिशय सतर्कतेने विचारपूर्वक पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या उमेदवारालाच मत देण्याची आवश्यकता आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी “जनशक्ती “ची ताकत यावेळी तरी दिसणं आवश्यक झालं आहे.
प्रत्येक निवडणुकीत साम दाम दंड भेद यांनी नितिचा वापर करत राजकीय चाली खेळल्या जातात. पैशाची ताकद दाखवतानाच वेगवेगळी आमिष देखील दिली जातात. वेळप्रसंगी अल्पसंख्यांक बहुसंख्यांक असा वाद पेटवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली जाते. मतदार राजा ही दरवेळी अशाच गोष्टींना बळी पडून विकासाला खिळ बसली. नावलौकिक असलेलं शहर विकासापासून वंचित राहिलं. विकासाची दृष्टी नसणारे गाव कारभारी झाले. परिणामी मोठी बाजारपेठ असलेलं हे गाव बकाल झालं.नवी दृष्टी असणार तरुण तडफदार नेतृत्व न मिळाल्यामुळे मागासलेपणाचा शिक्का मारला गेला. धनशक्तीचा वापर केला की बाहेरगावाहून देखील चौसाळ्याचा कारभार हाकता येतो हे व्यापारी डोके देखील वापरलं गेलं. फक्त सत्ता आपल्याच घरात असावी एवढीच नीती आजपर्यंत अवलंबिली गेली. पण आता तरी जग कुठे चाललं आपण कुठे आहोत याचा सारासार विचार जनतेने करण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्याने आपल्याच तालात जात असताना किंवा शाळेत आपल्याच मौजमस्तीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कानावर “शिट्टीचा” फूर्ऽऽर आवाज आला की सावधगिरी येते तितकीच सतर्कता मतदान करताना देखील येणं आवश्यक आहे. तरच विकासाची वाट सुलभ(।) होईल. मतदार राजा “जो” पर्यंत “गं”भीरतेने “दंड ” थोपटत नाही.”जनशक्ती “ची ताकद दाखवत नाही तोपर्यंत
खऱ्या अर्थाने विकासाची नवं पहाट जीवनात येणार नाही. पुन्हा पाच वर्ष धनशक्ती पुढे वाकून दीन पणे काम होण्याची वाट पहावी लागणार!