रणधुमाळी : गाव कारभा-यांची लगबग ; कागदपत्र जुळवा-जुळवीसाठी तहसिलला वाढल्या चकरा

बीड – जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडणूकांचे वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. १८ डिसेंबर रोजी सातशेहून अधिक ग्रा. प. साठी मतदानाची प्रक्रीया पार पडणार आहे. यासाठी पॅनल प्रमुख उमेदवारांची निवड व निवडणूक आयोगाला देण्यासाठी लागणारे कागदपत्रांची जुळवा-जुळव करत आहेत. जिल्ह्यातील आकरा तालुक्यांमधील गाव पुढा-यांच्या तहसिल कार्यालयांमध्ये कागदपत्रांसाठी चकरा वाढल्या आहेत. कडक थंडीत गावातील राजकारण तापत असल्याचा प्रत्यय जिल्ह्यात येत आहे.
येत्या दोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका आहेत. आगामी काळातील निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून देखील जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडूकांकडे पाहिले जाते. याचाच परिणाम राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिंदे गटासह इतर पक्ष व संघटना ग्रा. प. निवडणूकांमध्ये उडी घेत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
ग्रामीण राजकारणावर पकड कोणाची ?
–राज्याच्या राजकारणात तत्वाची मुक्ताफळे उधळल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने बीड जिल्ह्यात ग्राम पंचायतींच्या निवडणूका होत आहेत. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांसह माजी आमदार व पक्षांचे जिल्हाध्यक्ष ग्राम पंचायतीच्या निवडणूकांमध्ये पक्षांच्या व नेत्यांच्या नावाने पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकंदरीत ग्रामीण राजकारणावर अमुक एका पक्षाची किंवा नेत्याची पकड असल्याचा संदेश पक्ष श्रेष्ठींना दाखविण्याचा देखील प्रयत्न होत आहे. आता येत्या ग्राम पंचायतींनमध्ये गाव कारभारी तत्व , निष्ठा पाळणार की, राज्याच्या राजकारणाचा पायंडा कायम ठेवणार हे पहाण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागणार आहे.
इच्छुकांकडून नळपट्टी अन् घरपट्टी भरण्यासाठी धावपळ –
ग्राम पंचायतींच्या घर पट्टी व नळपट्टी वसूलीचे मोठे आव्हाण संबंधीत ग्रामसेवकांच्या समोर असते. मात्र आता ज्यांना ग्राम पंचायत निवडणूक लढवायची आहे. त्यांना नळपट्टी व घरपट्टी भरणे आश्यक असल्याने ग्रामसेवकांना स्वत: संपर्क करून नळपट्टी व घरपट्टी भरली जात असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहायला मिळत आहे.