सावे साहेब..! तुमची दिवाळी ; शेतकऱ्यांचं दिवाळं..! तुमच्या सरकारच्या नियत मे खतरे- शेतकऱ्यांच्या झोली मे फतरे

बीड — परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या घरावर वरवंटा फिरवला,उण्याला पुरवठा म्हणून सरकारच्या सुलतानी कारभाराने शेतकरी पुरता नागवला गेला. बैठकांच आवडंबर सुरू झालं. बैठकात काजू बदाम खाऊन तुमची दिवाळी होऊ लागली.कृषिमंत्र्यांना तर जिल्हाधिकाऱ्यांना दारूची ऑफर देऊन दिवाळी साजरी करावी वाटली. इथं शेतकऱ्यांचा दिवाळं निघालय, तो बरबाद झालाय पुढं कसं व्हायचं म्हणून विवंचनेत आत्महत्या करतोय. बैठकांची ढोंग बंद करून आता तरी ठोस उपाय करा.जनतेचा सरकार वरील विश्वास उडालाय याचं तरी भान ठेवा.तुमच्या नियत मे खतरे किसान के झोली मे फतरे असं आता जनतेत म्हटलं जाऊ लागला आहे.
गोगलगाईच्या संकटाने शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. कसंतरी सोयाबीन शेतात दिसू लागलं तर पावसाने एक महिन्याचा खंड दिला. त्यानंतर पडलेल्या पावसाने काहीतरी पदरात पडेल अशी आशा शेतकऱ्यांना निर्माण झाली. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अक्षरशः वरवंटा फिरवला.पाच लाख हेक्टर उभ पिक पाण्यात सडलं.शेतकऱ्यांच पुरता दिवाळं निघालं. तरीही सरकार दिवाळी साजरी करा आम्ही पाठीशी आहोत अशी नुसतीच वल्गना करून थकलं. कृषिमंत्र्यांनी दौरे केले. सावे साहेब तुम्हीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मात्र यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही. पाहणी दौरे करत असताना काजू बदाम खाऊन बैठका घेतल्या शेतकऱ्यांना जगायचं कसं ही विवंचना असताना सरकार मात्र 50 खोके एकदम ओके यातच अडकलं. कृषिमंत्री सत्तार यांना तर मंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर हर्षवयव झाला. त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपणही थोडीशी दारू घेता का? अशी ऑफर दिली. शेतकऱ्यांना रब्बी पिकाची पेरणी कशी करावी? पावसाने शेतात तर माजलेला असताना ती शेत दुरुस्त कशी करावी अशी विवंचना निर्माण झाली.महागा मोलाच बियाणं खरेदी करायचं कसं? खरिपाची पेरणी करताना घेतलेलं कर्ज फेडायचं कसं? दुसरं पीक हातात येईपर्यंत जगायचं कसं? यासारख्या समस्यांनी पुरत घेरलं. सावे साहेब सत्तेत बसल्यामुळे तुमची दिवाळी जल्लोषात साजरी झाली. पण शेतकऱ्यांची दिवाळी दिवाळं निघाल्यामुळे अंधारात गेली. शिंदे फडणवीस यांच सरकार आशेची पणती शेतकऱ्यांच्या घरात लावू शकलं नाही. नुसताच बैठकांचा फार्स शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनत आहे. आढावा बैठक घेतल्यानंतर तुम्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहात.शेतकऱ्यांच्या संकटात तुम्ही जबाबदारी पासून पळ काढू लागलात तर उद्या हीच जनता जनार्दन तुम्हाला कितपत स्थान देईल. याचा साधा विचार देखील डोक्यात कसा येत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला असलेला बीड चा बुरुज तुमच्या कार्यकर्तृत्वाचा लोना लागल्यामुळे ढासळू लागल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी उभा केला तर तुमचा बालेकिल्ला वाचेल याची जाणीव ठेवा. नाहीतर पक्षाचे पदाधिकारी यांना बुजगावण्याची देखील किंमत राहणार नाही हे देखील लक्षात राहू द्या.सरकारने अजून मदतीची कुठलीच ठोस घोषणा न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागला आहे. सरकार आमच्याशीही आता गद्दारी करत आहे असा सूर उमटू लागला आहे. किमान सावे साहेब शेतकऱ्यांचा आर्त टाहो सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळाच्या कानावर घाला.शेतकऱ्यांना ठोस मदत द्या. अशी मागणी जोर धरू लागली आहे