ई पीक पाहणीची अट रद्द ; शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार

मुंबई — अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या पंचनाम्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य नसल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे
पिकाच्या पंचनाम्यासाठी ई पिक पाहणी प्रक्रिया अनिवार्य होती. मात्र ईपीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मदत मिळवण्यासाठी ही अट रद्द करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती. दरम्यान ही अट तात्पुरती रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत होणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची तीन दिवस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. त्याचबरोबर नुकसान झालेला कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं देखील विखे पाटील यांनी सांगितले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यासाठी राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या दुप्पटीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यामुळे आता शेतकऱ्याच्या हातात मदत कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.