औरंगाबाद — वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि दर महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती वीजग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ” वीज बिल भरा अन बक्षिस मिळवा ” 238 लक्की ड्रॉ साठी तब्बल 7 लाख 47 हजार 502 वीज ग्राहकांनी वीज बिल देय दिनांकापूर्वी वीज बिलाचा भरणा करून उदंड प्रतिसाद दिला.
बक्षिस जिंकण्यासाठी वीज ग्राहकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. या बक्षिसांची निवड महावितरणच्या विशेष एॅपद्वारे लक्की ड्रॉ सोमवार दिनांक 11 जुलै 2022 रोजी काढण्यात येणार आहे.
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते. परंतु सर्वच ग्राहक वेळेवर आपली बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. यासाठी 1 जूनपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेत दर महिन्याला बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून एक अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाईन बिल भरल्यास 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे.
यामध्ये प्रादेशिक कार्यालयात स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटरचे दरमहा बंपर बक्षीस आहे.तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस दिले जाणार आहे. 3 परिमंडलांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. 9 मंडलांतून प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट किंवा टॅब्लेट, यासोबतच दरमहा 22 विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. दर महिन्याला मराठवाड्यातील 101 उपविभागातून हजार रुपयांपर्यतची प्रत्येकी 2 बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत.
बक्षिसासाठी पात्र ठरलेले ग्राहक
परिमंडल सहभागी ग्राहक
औरंगाबाद 2,74,591
लातूर 2,61,565
नांदेड 2,11,346
प्रादेशिक 7,47,502
कार्यालय
” वीज बिल भरा अन बक्षिस मिळवा ” 238 लक्की ड्रॉ बक्षिसांची निवड करण्यासाठी महावितरणने विशेष एॅप तयार केले आहे. यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही. याची पुरेपुर दक्षता महावितरणने घेतली आहे.