बीड — शिक्षण विभागाचा गलथान कारभार आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला.परीक्षेसाठी चक्क नियम पायदळी तुडवून मांडव घातला. या मांडवातच विद्यार्थ्यांना दहावीचा पेपर सोडवावा लागला. हा लाजिरवाणा प्रकार कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाला.
बीडमध्ये कधी कुठे काय घडेल व त्यासाठी कसे नियम पायदळी तुडवले जातील याचा थांग पत्ता लागणं अवघड आहे. कॉपी मुक्त अभियान राबवले जात असताना ” मांडव पॅटर्न”उदयाला आणला गेला. कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी चक्क मांडव घालण्यात आला. तेथे बाकडे मांडण्यात आले. उन्हाची काहिली वाढलेली असताना तब्बल 85 विद्यार्थी पायावरती पॅड ठेवून ताटकळत कसाबसा पेपर सोडवावा लागला. या विद्यार्थ्यांच्या तारांबळीचा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झालेल्या परिणामाला जबाबदार शिक्षण विभाग राहणार आहे. एक महिन्यापासून दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू असताना या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नाही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही का? विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवणं आवश्यक आहे.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने हा कुटाणा केला. नियमानुसार, बोर्डाची परीक्षा ही सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि अधिकृत परीक्षा कक्षातच होणे बंधनकारक असताना, कुर्ला केंद्रावर मात्र या सर्व नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराची चर्चा जिल्ह्यासह राज्यात सुरू झाली आहे.या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे




